सातारा : पाणीटंचाई, घटत्या भूजल पातळीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरू पाहात आहे. जिल्ह्यात ‘रोहयो’तून विहीर पुनर्भरणाची तब्बल १५२३ कामे हाती घेण्यात आली. त्यातील १०७५ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी एक कोटी २९ लाखांचा निधी अनुदान स्वरूपात प्राप्त झाला आहे.
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करणे, अखंड जलस्त्रोत निर्माण करणे तसेच भूजल पातळी वाढण्यासाठी रोजगार हमी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून, तसेच इतर शासकीय विभागांमार्फत महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनतंर्गत विहीर पुनर्भरणाच्या कामांवर भर दिला जात आहे.
पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांना पुनर्भरणासाठी १२ ते १५ हजारांचे अनुदान मिळत आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी या अनुदानाकरिता जमिनीची अट नाही. जिल्ह्यात ‘रोहयो’तून विहीर पुनर्भरणाची एक हजार ५२३ कामे हाती घेण्यात आली. त्यातील एक हजार ७५ कामे पूर्ण झाली असून, त्यावर एक कोटी २९ लाखांचा निधी अनुदान स्वरूपात प्राप्त झाला आहे.
माण तालुक्यात सर्वाधिक ४६९ विहीर पुनर्भरणाची कामे मंजूर असून, त्यातील ४११ कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ खटावमध्ये ३७९ पैकी २५२ कामे पूर्ण आहेत. तसेच कोरेगाव १८४, वाई १४५, फलटणमध्ये १२४ कामे मंजूर आहेत. या योजनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत असल्याने विहीर पुनर्भरण कामास गती मिळाली आहे. या पुनर्भरणामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होण्याबरोबरच पाण्याची शुद्धता आणि जतन करणे सोपे होणार आहे.