इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. पण सदोष यंत्रणा व गळतीमुळे इचलकरंजीला कृष्णेचे पाणी पुरेसे होत नाही. इचलकरंजीला असणारी पंचगंगा नदी ही इचलकरंजीतील उद्योगधंद्यातील पाण्यामुळे दूषित झाली आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही. पंचगंगेचे दूषित पाणी व कृष्णेचे अपुरे पाणी पाहून वारणा नदीवरून पाणी आणण्याची योजना आखण्यात आली. शिरोळ तालुक्यातील दानोळी येथून ही योजना आणण्याचे निश्चित करण्यात आले.
या योजनेच्या बांधकामाचा प्रयत्न हाणून पाडल्याबद्दल दानोळीतील शंभरहून अधिक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने प्रशासनाच्या विरोधात ग्रामीण भागातून प्रचंड संताप आहे. एक तर आमच्या नद्यावर डोळा ठेवता आणि अडवले की आमच्यावरच कारवाई करता, असा सूर ग्रामस्थांचा असल्याने या गावात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या आठ दिवसांत हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांनी बंद, मोर्चा काढून योजनेविरोधी भावना व्यक्त केल्या आहेत.
दोन्हीकडून जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू झाल्याने आता प्रशासनाची हा प्रश्न सोडविण्यासाठी कसोटी लागणार आहे. हा प्रश्न एका गावाचा राहिला नसून वारणा काठावरील शेकडो गावात याची दाहकता पसरत आहे. हिंसक प्रकार टाळून योजनेला सुरवात होते की लोकरेट्यामुळे ही योजना स्थगित करावी लागते, याचे उत्तर येणारा काळच देणार असल्याने आता संघर्ष टाळणे यालाच प्रथम प्राधान्य द्यावे लागणार आहे.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.