नाशिक : दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचे पाणी गोदावरी खोऱ्याद्वारे दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविणे गरजेचे अाहे. या पाण्यावर गुजरातचा कोणताही हक्क नाही, असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
शिवाय केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हाती घेतला असून, ही योजना देशासाठी घातक आहे. कंत्राटदार व राजकीय नेत्यांच्या टक्केवारीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याची टीका करत देशासाठी नदीजोड नव्हे; तर नदीला तलावाशी जोडा ही योजना राबविण्यात यावी, अशी अपेक्षा डॉ. सिंह यांनी व्यक्त केली.
ते नाशिक दौऱ्यावर आले असता सोमवारी (ता. ९) पत्रकार परिषद घेऊन डॉ. सिंह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात यापूर्वीदेखील नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, या सर्व योजना अपयशी ठरल्या. नदीजोड प्रकल्प म्हणजे ‘लिंक ऑफ करप्शन व लिंक ऑफ पोल्यूशन’ असल्याचे त्यांनी सांगितले.
नदीजोड प्रकल्पामुळे देशातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. नदीजोड योजना म्हणजे देश तोडण्याची व्यवस्था आहे, अशी टीका त्यांनी केली.