आंबेठाण, जि. पुणे : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून रविवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपासून ७८३ क्युसेक वेगाने पाणी सांडव्याच्या दोन दरवाजांतून भामा नदीपात्रात सोडण्यास सुरवात झाली. कालवा सल्लागार समितीच्या धोरणानुसार हे पाणी सोडल्याचे भामा आसखेड प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असेही आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील हे पहिलेच आवर्तन आहे.
भामा आसखेड धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. सध्या धरणात ७.३९ टीएमसी पाणीसाठा आहे. रविवारी सकाळपासून धरणाच्या चार पैकी एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून भामा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली. त्यासाठी दरवाजे १५ सेंटिमीटरने वर उचलण्यात आले आहेत. पाणी सोडण्यास सुरवात करण्याअगोदर धरणातील पाणीसाठा ९६.४८ टक्के होता, तर पाणी पातळी ६७१.०० मीटर इतकी होती.
खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला भामा आसखेड वरदान ठरत असून या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी आणि नाले तुडुंब असल्याने धरणातून पाणी सोडण्याचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही. १६ ते १८ नोव्हेंबर या तीन दिवसांदरम्यान धरणातून ५५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. खेड तालुक्यातील सिद्धेगव्हाणपर्यंत हे पाणी सोडण्यात आले होते.
रविवारी सोडण्यात आलेल्या पाण्याने आलेगाव पागापर्यंत असणारे सर्व बंधारे भरले जातील आणि त्यास साधारणतः ७ ते ८ दिवस लागतील, असेही धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.