जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गणले जाणारे हतनूर धरण ९८.९० टक्के भरले असून, त्यातून सध्या विसर्ग सुरू आहे. त्यासाठी दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. तीन प्रकल्प मात्र कोरडेच राहिले आहेत. त्यात अग्नावती, बोरी व भोकरबारी या जिल्ह्यांतील पश्चिम पट्ट्यातील प्रकल्पांचा समावेश आहे.
जिल्ह्यात यंदा पाऊस जेमतेम असाच राहिला. सप्टेंबरच्या मध्यात आलेल्या पावसामुळे बहुळा, मन्याड प्रकल्पातील साठा काहीसा वाढला; पण तोदेखील आजघडीला जेमतेम असाच आहे. जिल्ह्यातील हतनूरमध्ये १०० टक्के जलसाठा राहील हे निश्चित आहे. गिरणामध्ये ६५.४०, वाघूरमध्ये ७१.७३ टक्के जलसाठा आहे. ही बाब लक्षात घेता यंदा वाघूर व गिरणा धरणातून प्रत्येकी तीन व दोन आवर्तने मिळतील, हे निश्चित आहे. हतनूरमधूनही तीन आवर्तने मिळतील.
सध्या जिल्ह्यात कुठेही पाऊस नाही. काही भागांत मागील आठवड्यात कमी- अधिक पाऊस झाला; पण प्रकल्पांमधील साठा वाढेल, अशी कुठलीही स्थिती नाही. सध्या हतनूर वगळता इतर कुठल्याही प्रकल्पात आवक सुरू नाही. आवक जवळपास थांबली आहे. सध्याचा साठा हा अंतिम असू शकतो, असे संकेत गिरणा भवनमधून मिळाले आहेत.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधून आवर्तने देण्यासंबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही; पण त्यासाठी लवकरच कालवा समितीची बैठक होणार आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व संबंधित लाभार्थी शेतकरी या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीची तारीख ठरलेली नाही; परंतु पुढील आठवड्यात ही बैठक होईल, अशी माहिती मिळाली.