जळगाव ः खानदेशात मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीवरील जवळपास सर्वच प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा प्रकल्पातूनही सांडव्याद्वारे पाणी सोडले जात आहे. तापी नदीवरील जळगाव येथील हतनूर प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडे आहेत. यातील चार दरवाजे बुधवारी (ता. ११) सकाळी ६ वाजता उघण्यात आले. चार दरवाजे एक मीटरने उघडे असून, इतर दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे आहेत. हतनूर धरणातून १४ हजार ११७ क्सुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
धुळे जिल्ह्यातील तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजचा एक दरवाजा एक मीटरने उघडा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सागंरखेडा बॅरेजचा एक दरवाजा एक मीटरने उघडा आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीवरील पांझरा प्रकल्प १०० टक्के भरला असून, त्याच्या सांडव्यामधून सध्या १२३४ क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती जळगाव येथील पूर नियंत्रण कक्षातून मिळाली.
मालनगाव प्रकल्पही १०० टक्के भरला आहे. यासोबत जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमधील पाणीसाठाही काहीसा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यांतील अभोरा, मंगरूळ, सुकी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर हतनूरमधील साठाही ९८.६३ टक्के आहे. जळगाव जिल्ह्यातील अग्नावती, बोरी व भोकरबारी प्रकल्पांत शून्य टक्के जलसाठा आहे.