नगर ः उन्हाची तीव्रता जशी वाढू लागली आहे, तशी पाणीटंचाईची झळही वाढत आहे. पाणीटंचाईच्या झळा गाव पातळीवरील वैयक्तिक पाणी योजनांनाही बसत आहे. पाणीपातळी खालावल्यामुळे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील ५५ पाणी योजना बंद पडल्या आहेत. याशिवाय १६ योजना पाइपलाइन खराब झाल्याने तर अन्य पाच योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या आहेत, असे असले तरी यंदा गतवर्षीच्या तुलनेत स्त्रोत आटल्यामुळे योजना बंद होण्याचे प्रमाण कमी आहे.
एखाद्या तालुक्याचा अपवाद वगळता दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून तर दुष्काळाची तीव्रता जास्त होती. जानेवारी, फेब्रुवारीतच टॅंकरद्वारे पाणी देण्याची गरज निर्माण झाली होती. दोन वर्षांपूर्वी जिल्हाभरात तब्बल ८०० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.
गावपातळीवरील पाणीपुरवठा योजना पाणीस्त्रोत आटल्याने बंद पडण्याचे प्रमाणही ३० ते ३५ टक्क्यांवर जात होते. दोन वर्षांपासून मात्र स्थितीत बदल झाला आहे. जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरची संख्या कमी झाली आहे. आता थेट मे महिन्यात स्त्रोत आटू लागल्याने वैयक्तिक पाणीपुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये १४१७ वैयक्तिक पाणीपुरवठा योजना असून आतापर्यंत ७६ योजना बंद आहेत. त्यातील ५५ योजना स्त्रोत आटल्याने बंद असून १६ योजना पाइपलाइन नादुरुस्त असल्याने बंद आहेत. जलस्त्रोत आटू लागल्याने पाणी योजना बंद पडू लागल्या असल्या तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा वीस टक्केही नाही.
जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे पाणी साठवण क्षमता वाढल्याने पाणी योजना बंद पडण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यांतील एकही योजना अजूनतरी बंद पडलेली नाही.