दमदार पावसाच्या हजेरीनंतरही सातारा जिल्ह्यात टॅंकर सुरूच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः गेल्या दोन महिन्यांत पावसाने जिल्ह्यातील विविध भागांना झोडपून काढले आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर (ता.२३) ६४६ मिमी पाऊस झाला. मात्र माण व खटाव तालुक्‍यांतील १२ गावे व ५७ वाड्या वस्त्यांना पाणीटंचाई भेडसावत असून, या गावांना १० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात पूर्वेकडील भाग दुष्काळी, तर पश्‍चिमेकडील भागात अतिपाऊस असे चित्र दिसून येते. मे महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत कमी अधिक प्रमाणात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. जुन, जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले, परिणामी टॅंकरच्या संख्येत घट झाली होती.

मात्र आजही माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांतील काही गावांत पाऊस न झाल्याने पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर ६४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र माण आणि खटाव तालुक्‍यातील ग्रामस्थांना अजूनही पाण्यासाठी टॅंकरची वाट पाहावी लागत आहे. या दोन तालुक्‍यांत सध्या १२ गावे ५७ वाड्या वस्त्यांवरील २४ हजार १८० लोकसंख्येस दहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्‍यात आठ गावे ४२ वाडी वस्त्यांवरील ११ हजार ४७० लोकसंख्येला पाच, तर खटाव तालुक्‍यातील चार गावे, १५ वाड्या वस्त्यांवरील १२ हजार ७१० लोकसंख्येस पाच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सात विहिरींचे अधिग्रहण संरक्षित पाणीसाठ्यासाठी माण, खटाव या दोन तालुक्‍यांत ७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्‍यातील सहा व खटाव तालुक्‍यातील एका विहिरीचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com