औरंगाबाद : मराठवाड्यातील ८१७ गावे-वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसताहेत. या गाव-वाड्यांमधील १४ लाख ८० हजार ७७६ लोकांची तहान ८७२ टॅंकरव्दारे भागवली जात आहे. पाण्यासाठी मराठवाड्यातील १९५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
एकीकडे मॉन्सून आगमनची चाहूल लागत असतानाच मराठवाड्यातील पाणीटंचाईची धगही तीव्र होत चालली आहे. पावसाळा वेळेवर सुरू झाला तरी पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास पुढील काही काळ लागणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या झळा बसणाऱ्या गावे-वाड्यांमध्ये ६७३ गावे व १४४ वाड्यांचा समावेश आहे. टंचाईग्रस्त गाव, वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ८०८ खासगी व ६४ शासकीय टॅंकरची सोय करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्यातील ५३९ गावे-वाड्यांना बसते आहे. या टंचाईग्रस्त गावे वाड्यांची तहान भागविण्यासाठी ५८२ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.
त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील ९२ गावे व १६ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या टंचाईग्रस्त गावे-वाड्यांची तहान भागविण्यासाठी १११ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील ५५ गावे व ४४ वाड्यांना १११ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील २६ गावे व ९ वाड्यांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील १८ गावे व ४ वाड्यांची तहान भागविण्यासाठी २० टॅंकरची सोय करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील ९ गावे व ४ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत येथे ११ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. लातूर जिल्ह्यात केवळ एका गावात पाणीटंचाई जाणवत असून तेथे एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अजून एकाही गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नाही.
मागील आठवड्यात मराठवाड्यात १३ लाख ८५ हजार ७२१ लोकांना पाणीटंचाईला समोरे जावे लागत होते. या आठवडाअखेर यामध्ये ९५ हजार ५५ लोकसंख्येची त्यात भर पडली आहे. आजघडीला मराठवाड्यातील १४ लाख ८० हजार ७७६ लोकांची तहान टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे.