नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आतापर्यंत पारनेर व संगमनेर तालुक्यातील १७ गावे आणि ६० वाड्यांसाठी १७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अजून साधारण सात ठिकाणांहून टॅंकर सुरू करण्याची मागणी करणारे प्रस्ताव आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात भंडारदरा, मुळा, निळवंडे, आदी धरणांच्या कार्यक्षेत्राचा काहीसा भाग वगळला तर पारनेर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, संगमनेर, कर्जत, श्रीगोंदा आदी भागांत सातत्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गेल्या तीन वर्षांपासून टॅंकरची संख्या कमी होत आहे. यंदा तर एप्रिल महिन्यापर्यंत टॅंकर सुरू करण्याची गरज भासली नाही.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘जलयुक्त’ची कामे जोरात सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ५४३ गावांत झालेली ‘जलयुक्त’ची कामे व २०१७ मध्ये झालेला १६५ टक्के पाऊस याचा एकत्रित परिणाम म्हणून भूजलपातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार व वृक्ष लागवडीच्या मोहिमांनी ही स्थिती झपाट्याने बदलली आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच कडाक्याच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाई निर्माण झाली नसल्याचा असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
आता मात्र टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. आता प्रशासनाने संगमनेर तालुक्यातील वरवंडी, कर्जुले पठार, पानोडी, वनकुटे, चिंचोली गुरव, सायखिंडी, दैवकोठे, डोळासणे, पिंपळगाव देपा, पिंपळे, सावरगाव, पोखरी बाळेश्वर ही गावे व ४५ वाड्या वस्त्या तर पारनेर तालुक्यातील पळशी, वासुंदे, काताळवेढा, पळसपूर या गावांसह पंधरा वाडी, वस्तीवर चार टॅंकर सुरू केले आहेत. अजून साधारण सात ठिकाणांचे प्रस्ताव असून पाहणी अहवाल आल्यानंतर टॅंकर सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.