सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा संपत आला तरी, कोरडे असलेले पाझर तलाव यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सिंचन योजनांच्या आवर्तनासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या. पण, आवर्तन सुरू करण्यास नेत्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

गतवर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद शासन दरबारी झाली असली तरी, ७९ पाझर तलावांपैकी ५० हून अधिक पाझर तलाव कोरडेच आहेत. यामध्ये दुष्काळी पट्टयातील आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यांतील पाझर तलावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांत गतवर्षाच्या तुलनेत कमी पावसाचीही नोंद झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आटपाडी आणि जत तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच भेडसावू लागली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची निवड झाल्यानंतर दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांत चैतन्य निर्माण झाले होते. खासदार पाटील यांनी जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेच्या अावर्तनासाठी सांगली, सोलापूर जिल्ह्यांसह सांगोला तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन चारच दिवसांत सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन या योजनांची अावर्तने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. पण, बैठक होऊनही बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, सिंचन योजनांच्या अावर्तनाचे नियोजन अद्याप झालेले नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी या योजनांच्या आवर्तनाकडे डोळे लावून बसले आहे.

दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजनांची गेल्या १६ वर्षांच्या काळात राजकीय मंडळींनी अनेकवेळा बटने दाबून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर या सिंचन योजना कळीचा मुद्दा ठरल्या आहेत. म्हैसाळ सिंचन योजनेवर मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि सोलापूर जिल्ह्यांतील सांगोला तालुक्याचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळींनी आतापासूनच तयारी चालविली आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंचन योजनांच्या अावर्तनाचा आणि पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता बळावली आहे. आठवडाभरात या सिंचन योजनांची आवर्तने सुरू झाली नाही, तर दुष्काळी भागातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com