सांगली ः परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ५ मध्यम आणि ७९ लघू प्रकल्पांत ५८ टक्के पाणीसाठा होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अर्थात एका महिन्यात ८४ प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुमारे १६ टक्क्यांनी घट झाली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी, तर तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी तलावात एकही थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत पाणीटंचाईची शक्यता आहे. गतवर्षी पाणीटंचाईचे संकट असताना परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगला दिलासा मिळाला होता.
परतीचा पाऊस व टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या आवर्तनामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पामध्ये पाणीसाठा वाढला होता. डिसेंबर महिन्याअखेर ५८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाई भासू लागली आहे. तलावामध्ये असलेला पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच मध्यम प्रकल्पांमध्ये २४.७५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५० टक्के, तर लघू प्रकल्पांमध्ये ६८.०६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जत तालुक्यात एकूण २८ तलाव आहेत. या तलावात १४४६.८० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
२८ तलावांपैकी ६ तलावात पाणीसाठा शुन्य टक्के असल्याची नोंद आहे. त्यापैकी संख तलावात ८५, तर लघू प्रकल्पातील दरीबडची या तलावात ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जत तालुक्यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.