आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढ

आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढ
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढ

सांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवस झालेल्या पावसामुळे तलावाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. टेंभू योजनेच्या पाण्यामुळे या भागातील तलाव भरण्यात आले होते. पावसामुळे पाणीसाठा वाढण्यात मोठी भर पडली आहे. यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात सलग दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या करण्यायोग्य वातावरण आहे. त्यामुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस झाला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे बरीच गावे तालुक्यातील पावसाविना राहिली आहेत. पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. याचा लाभ खरीप हंगामासाठी होणार आहे.

पंधरा दिवस खरीप हंगाम लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र पावसाने हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला आहे. खरिपासाठी पावसाने सुरवात चांगली केल्याने सध्यातरी शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

टेंभू योजनेचे पाणी उन्हाळ्यापासून सुरू असल्याने तालुक्यातील बारा तलाव भरून घेण्यात आले. त्यामुळे पाणीपातळी कमी झाली होती. दोन दिवस झालेल्या पावसामुळे पश्चिम भागातील काही तलावात पाणीसाठा वाढला आहे. आटपाडी तालुका पर्जन्य छायेखाली येत असल्याने मॉन्सूनचा पाऊस होत नाही. तालुक्यात वळवाच्या पावसाने तारले, तरच खरीप व रब्बी हंगाम साधला जातो.

टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे दुष्काळाची दाहकता कमी होऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. सध्यातरी खरीप हंगामासाठी वातावरण पोषक आहे. दोन दिवसांत खरिपाच्या पेरण्या शेतकरी सुरवात करण्याच्या तयारीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com