सातारा ः जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांत ९५ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. वीजनिमितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कोयना धरणही ९९ टक्क्यांवर; तर कण्हेर व धोम-बलकवडी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.
जिल्ह्यात परतीचा पाऊस दमदार झाल्याने प्रमुख धरण पाण्याने भरून वाहिली आहे. दमदार पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने सर्वच धरणांतून धरण व्यवस्थापनास पाणी सोडावे लागले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्याने नदीपात्र स्वच्छ झाले आहे.
राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कोयना धरण एकूण १०४.४० टीएमसी व ९९.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. याचा फायदा विजेचे भारनियमन कमी होण्यास मदत होणार आहे.
धोम, कण्हेर व उरमोडी ही धरणे दुष्काळी तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची धरणे आहेत. या तीनही धरणांत ९८ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळी तालुक्यात पाणी मिळणार असल्याने रब्बीसह उन्हाळी पिकांना पाणी देता येणे शक्य आहे.
धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) व टक्केवारी
धरण | एकूण पाणीसाठा | टक्केवारी |
कोयना | 104.40 | 99.25 |
धोम | 13.38 | 98.98 |
कण्हेर | 10.10 | 100 |
धोम-बलकवडी | 4.08 | 100 |
उरमोडी | 9.89 | 99.19 |
तारळी | 4.99 | 85.38 |