परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील ७ आणि हिंगोलीतील ३ अशा एकूण १० लघू तलावांमधील पाणीसाठा अद्याप जोत्याखालीच आहे. नांदेड जिल्ह्यातील १९ लघू तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आत्ताच दिसत नाही. अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, रविवारी (ता. २४) येलदरी धरणांमध्ये ९३.७०२ दलघमी (११.५७ टक्के), सिद्धेश्वर धरणामध्ये ४४.३६२ दलघमी (५४.७९ टक्के), निम्न दुधना धरणांमध्ये १८२.०९० दलघमी (७५.४२ टक्के), करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १५.७३३ दलघमी (६३ टक्के), मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ३.९०२ दलघमी (१४टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, दिग्रस येथील उच्च पातळी बंधारे भरले आहे.
परभणी जिल्ह्यातील २२ लघू तलांवापैकी झरी (ता. पाथरी) येथील लघू तलाव १०० टक्के भरला आहे. अन्य तलावांपैकी १० तलावांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत, तर ४ तलावांमध्ये २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावातील पाणीसाठ्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे.टाकळवाडी, कोद्री (ता. गंगाखेड), नखातवाडी (ता. सोनपेठ), तांदुळवाडी (ता. पालम), चिंचोली, आडगाव, दहेगाव (ता. जिंतूर) या ७ तलावांतील पाणीसाठा मात्र अद्याप जोत्याखालीच आहे.
हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू तलावांपैकी २ तलाव १०० टक्के भरले आहेत. ९ तलावांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. ५ तलावांमध्ये २६ ते ५० टक्क्यांपर्यंत, ३ तलावांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत, ५ तलावांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. परंतु बाभुळगाव, मरसुळ, कळमनुरी या तीन तलावांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखालीच आहे.
नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू तलावांपैकी १९ तलावांमध्ये अद्याप उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला नाही. यामध्ये देऊळगाव, दिग्रस, आखरगा, हानेगाव-२, खामगाव, वसूर, देगलूर, येडूत, लोहमांडवा, सुना, चिकाळा, मोहिजा परंडा, कोंडदेव, नंदगाव, अंबाडी, उंदरी-मांजरी, दापका, बोमनाळी या तलावांचा समावेश आहे. उर्वरित पावसाळ्यात मोठा पाऊस होऊन हे तलाव भरले तर सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल; अन्यथा या भागातील नागरिकांना लवकरच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.