सातपुडा पर्वतालगतच्या विहिरी गाठताहेत तळ

यंदा पाऊस कमी असल्याने अनेक शेतकरी केळी लागवड टाळत आहे. हरभरा पेरणी अधिकची दिसून येत आहे. - नरेंद्र पाटील, शेतकरी, लोणी, ता. चोपडा, जि. जळगाव
पाणीपातळी
पाणीपातळी

जळगाव ः यंदाच्या कमी पर्जन्यमानाचा फटका जिल्ह्यातील सातपुडा पर्वतालगतच्या केळी, ऊस, भुईमूग उत्पादक गावांना बसायला सुरवात झाली आहे. चोपडा, यावल तालुक्‍यांतील अनेक गावांसह रावेरातील काही गावांमध्ये विहिरी आतापासूनच तळ गाठू लागल्या आहेत.  जिल्ह्यात यंदा फक्त ७५ टक्के पाऊस झाला आहे. त्यातच जून, जुलै व ऑगस्ट या तीन्ही महिन्यांमध्ये पर्जन्यमान हवे तसे नव्हते. सप्टेंबरमध्ये कमी-अधिक असा पाऊस झाला. त्यात सातपुडा पर्वतालगतच्या चोपडा, रावेर, यावल तालुक्‍यांत पर्जन्यमानासंबंधीची समस्या होती. एरवी सातपुडा पर्वतालगत पाऊस बऱ्यापैकी होत असतो; पण यंदा जोरदार पाऊस झालाच नाही. रावेरातील यावल व रावेरातील सातपुडा पर्वतातून येणाऱ्या मोर, सुकी नदीला पूर आलेच नाहीत. सुकी नदी तेवढी सप्टेंबरअखेरीस वाहत होती. त्यामुळे विहिरी, कूपनलिका रिचार्ज झाल्या, पण त्यांची पाणीपातळी उन्हाळ्यापर्यंत कायम राहीलच असे नाही. चोपडामध्येही अनेर नदीला चांगला पूर आलाच नाही. जुलै, ऑगस्टमध्ये ही नदी कोरडी होती. अनेर प्रकल्पासह मोर प्रकल्पही जेमतेम भरला आहे. सुकी प्रकल्पात पाणीसाठा दिसत असला, तरी यंदा तोदेखील पूर्ण भरलेला नाही.  या भागात विहिरी फक्त दोन तास पाणीउपसा करू शकतात. त्यापेक्षा अधिक पाणीउपसा होत नसल्याने नंतर विहीर बंद ठेवावी लागते. रावेरातील गारबर्डी हा लघू प्रकल्पही फारसा न भरल्याने निंभोरा, सिंगत, सावदा, चिनावल, बोरखेडा या भागांना फटका बसण्याची शक्‍यता आहे.  केळी उत्पादक गावांना धास्ती यावलमधील केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या न्हावी, भालोद, सांगवी बुद्रुक या गावांना कूपनलिका आटत असल्याने फटका बसण्याची शक्‍यता आहे. रावेरातील चीनावल, मस्कावदसीम भागांतही केळी उत्पादनासंबंधी नुकसान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर चोपडा तालुक्‍यातील खर्डी, वर्डी, आडगाव या भागांतही कूपनलिकांचे पाणी कमी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विहिरी तळ गाठू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड थांबविली आहे. कारण सध्या ज्या बागा आहेत त्या जगविण्याचे पुढे उन्हाळ्यात आव्हान असणार आहे. याच कारणामुळे उसाची लागवडही घटेल, असे चित्र आहे. पाणी कमी असल्याने हरभरा पिकाची अधिकची पेरणी यावल तालुक्‍यातील सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्ये झाल्याची माहिती मिळली.  प्रतिक्रिया आमच्या भागातील प्रकल्प सुरवातीच्या पावसानंतर भरले. पण अनेक नादुरुस्त प्रकल्पातून पाणी वाहून गेले. यावल तालुक्‍यातील वड्री व इतर भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे.  - अनिल विश्राम पाटील, शेतकरी, सावखेडासीम, ता. यावल, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com