बुलडाणा ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात हजारांपेक्षा अधिक कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित आहेत. मागील दोन वर्षांतील जोडण्यांची संख्याच सहा हजारांवर असून या प्रलंबित असलेल्या जोडण्या मे २०१८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या खरीप नियोजन बैठकीत महावितरणकडून दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१६ अखेर ९०४ आणि २०१६-१७ मध्ये पैशांचा भरणा केले ५१७२ अशा सुमारे सहा हजारांवर अर्जदारांना कृषिपंपांसाठी वीजजोडणी देऊ असे सांगण्यात आले आहे. नवीन वीजजोडण्या देण्यासाठी ७२ कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
या जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, मलकापूर उपविभाग असून मार्च २०१८ अखेर वीजजोडणीसाठी पैशांचा भरणा केलेले बुलडाणा उपविभागातील २४९२, खामगाव उपविभागातील ३१४१ आणि मलकापूरमधील १४२४ शेतकरी आहेत. एकूण बुलडाणा जिल्ह्यात सध्या कृषिपंप वीजजोडणीसाठीचे सात हजार ५७ अर्ज प्रलंबित आहे. त्यामध्ये मार्च २०१६ पर्यंतचे ९०४ आणि गेल्या वर्षातील ५१७२ अर्ज प्रलंबित आहेत.
महावितरणने गेल्या वर्षभरात या जिल्ह्यात दोन हजार ९४२ कृषिपंपांना वीजजोडण्या दिल्या आहेत. आता प्रलंबित असलेल्यांची संख्या सात हजारांवर असून, हा आकडा कसा पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात गेल्या वर्षभरात जवळपास तीन हजार जोडण्या दिल्या गेल्या तर आता मागील दोन वर्षांतील जोडण्या येत्या मे २०१८ अखेर देण्याचे नियोजन असल्याचे कंपनीने सांगितले. एवढ्या जोडण्या कशा जोडल्या जातील हा प्रश्न आहे.
हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना वीजजोडण्या मिळाल्या तर सिंचनासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु विविध अडचणींमुळे दरवर्षी जोडण्या देण्याचे प्रमाणात घट दिसून येत आहे. दिलेल्या आश्वासनानुसार वीजजोडण्या दिल्या जात नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जोडण्या करण्यासाठी वीज कंपनीला कोट्यवधीचा निधी हवा आहे. या निधीची वेळेवर उपलब्धता होणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. हा निधी मिळाल्यानंतर ही कामे वेग घेऊ शकतात.