‘वान’च्या पाण्यावरील संपूर्ण अारक्षण उठवण्याची मागणी

वाण प्रकल्पाप्रश्नी बैठक
वाण प्रकल्पाप्रश्नी बैठक
अकोला  ः वान प्रकल्प हा मुख्यतः सिंचनासाठी अस्तित्वात अाल्याने त्यातील पाण्यावर केलेले अारक्षण तातडीने काढावे, या प्रकल्पातील पाण्याचा सिंचनासाठी पाइपद्वारे वापर व्हावा, अशा प्रमुख मागण्या येथे सोमवारी (ता.२०) झालेल्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, तसेच शेतकरी संघटना नेत्यांच्या बैठकीत करण्यात अाल्या. 
 
जिल्ह्यातील वान प्रकल्प १०० टक्के भरलेला असून, त्यातील पाणी सिंचनाएेवजी इतरत्र वळविले जात अाहे. अकोला महानगरासाठी पाणी अारक्षित करण्यात अाले असून, रब्बीत हरभरा सिंचनासाठी केवळ एकच पाणी देण्याची सूचना जिल्हा पाणी अारक्षण समितीने केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तेव्हापासून या विषयावर सातत्याने ‘घमासान’ होत अाहे.
 
या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, यासाठी सोमवारी या प्रकल्पाच्या अखत्यारीत असलेल्या पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, तसेच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक अायोजित करण्यात अाली होती.         
 
या वेळी झालेल्या चर्चेचे मुद्दे जिल्हा पाणी अारक्षण समितीला द्यायचे ठरविण्यात अाले. यात प्रामुख्याने काही मागण्या करण्यात अाल्या. त्यात वान धरण हे मुख्यत्वे सिंचनसाठी असल्याने त्याच्या पाण्यावरील अारक्षण काढावे, पाइप टाकून सिंचनासाठी पाणी द्यावे,
ज्या काळात शेतकरी पाणी वापरत नसतील त्या काळात या प्रकल्पाचे पाणी विहिरी व कूपनलिकेच्या पुनर्भरणासाठी वापरावे, अकोट शहराला पोपटखेड धरणातून पाणी द्यावे, वान नदीच्या पाणलोट क्षेत्रात जी गावे नाहीत व त्यांना पाणीपुरवठा होत अाहे अशांसाठी त्यांच्या क्षेत्रातील पाणलोट विकसीत करून पाणी द्यावे,
 
पाणी अारक्षण समितीत कृषीतज्ज्ञ नसल्याने त्यांनी हरभऱ्याला एक पाणी देण्याचा सल्ला दिला अाहे त्यामुळे या समितीत कृषी तज्ज्ञांचा समावेश केला जावा, शासनाने कोणत्याही एका पिकाचा अाग्रह धरू नये अशा मागण्या करण्यात अाल्या.
 
बैठकीला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, श्री. गुल्हाने, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे नेते ललीत बहाळे, शेतकरी संघटनेचे प्रदेश सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड, तेल्हारा तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर, युवा अाघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, डॉ. नीलेश पाटील, राजू ढोले यांच्यासह  शेकडो शेतकरी उपस्थित होते. 
 
उपरोक्त विषयांवर जिल्हा समितीने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी संघटना वान प्रकल्पाच्या गेटची यंत्रणा स्वतः हातात घेऊन सिंचनासाठी पाणी सोडेल, असा इशारा या वेळी देण्यात अाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com