सातारा ः जिल्ह्यात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे अनेक गावे पाणीटंचाईवर मात करण्यात यशस्वी झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एक गाव व एका वाडीवस्तीवर अवघ्या एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत मार्चमध्ये टॅकरची संख्या तब्बल १८ ने घटली आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान, लोकसहभाग तसेच मनरेगांतर्गत झालेल्या कामांमुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ लागली आहे. या कामांमुळे अनेक गावे टंचाईमुक्त होऊ लागली आहेत.
गतवर्षी मार्चच्या अखेरीस जिल्ह्यातील माण, फलटण व वाई या तीन तालुक्यांत १९ टॅंकरद्वारे १६ गावे १३८ वाड्यावस्त्यांवरील २३ हजार १०४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक १६ टॅंकरद्वारे १४ गावे १२३ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. या वर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे, जलसंधारण कामांचा चांगला परिणाम झाल्याने भूजलपातळी वाढली आणि पाणीटंचाई कमी झाली आहे.
जिल्ह्यात सध्या माण तालुक्यातील गारवडी व आवळेपठार येथे एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंधारणाच्या कामाबरोबरच परतीचा पाऊस दुष्काळी तालुक्यात झाल्याने पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.
दुष्काळी तालुक्यात शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता बरी आहे. रब्बीतील पिकांची अवस्था चांगली असून हरभरा, गहू, रब्बी ज्वारीची काढणीची कामे सुरू झाली आहेत. मार्च महिन्यात पाणीटंचाई कमी झाली असली, तरी एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाईबाबत स्थिती कशी असेल हे बघावे लागणार आहे.