परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे पडले आहेत. सात लघू तलावातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. उर्वरित ११ लघू तलावांमध्ये सरासरी नऊ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
दोन मध्यम प्रकल्पांमध्ये १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. विविध प्रकारे प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत चाला आहे. भूजल पातळी खोल गेली आहे. आठवडाभरात दोन लघू तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत चालले आहे.
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. वेगाचे वारे, उन्हामुळे जलाशयातील बाष्पीभवन वाढले आहे. लघू, मध्यम प्रकल्पांतून विविध माध्यमातून उपसा सुरू आहे. त्यामुळे सर्वच प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा घट होत चालली आहे.
टाकळवाडी (ता. गंगाखेड) आणि दहेगाव (ता. जिंतूर) हे दोन तलाव या आधीच कोरडे पडले होते. गेल्या आठवडाभरात जिंतूर तालुक्यातील चिंचोली आणि आडगाव हे दोन तलाव कोरडे पडल्याने पाणी आटलेल्या तलावांची संख्या चार झाली आहे. नखातवाडी (ता.सोनपेठ), तांदूळवाडी (ता.पालम), कोद्री (ता.गंगाखेड), जोगवाडा, बेलखेडा, केहाळ, भोसी (ता.जिंतूर) या सात तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यामुळे पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.
सध्या पेडगाव लघू तलावात (१५ टक्के), आंबेगाव तलावात (१४ टक्के), झरी तलावात (५३ टक्के), राणीसावरगाव तलावात (६ टक्के), पिंपळदरी तलावात (१२ टक्के), देवगावमध्ये (४ टक्के), वडाळीमध्ये (३ टक्के), चारठाणा तलावात (१२ टक्के), कवडामध्ये (११टक्के), मांडवी तलावात (१ टक्का), पाडाळी तलावात (४० टक्के) अशा ११ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी नऊ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
आठवडाभरात जिंतूर तालुक्यातील निवळी खुर्द येथील करपरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात २ टक्क्यांनी घट होऊन ३० टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात १ टक्क्याने घट होऊन ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. मोठा प्रकल्प असलेल्या येलदरी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा ३.३९ टक्के होता. परंतु शनिवारी (ता. १७) या प्रकल्पांतून सिद्धेश्वर धरणामध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे मृत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.