वाशीम : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई निर्माण झालेल्या ठिकाणी तातडीने टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
वाशीम दौऱ्यावर असताना श्री. खोत यांनी पाणीपुरवठा, कृषी विभागांचा अाढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. कारंजा येथे पंचायत समिती सभागृहात अायोजित या बैठकीला कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार सचिन पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, तालुका कृषि अधिकारी समाधान धुळधुळे यांच्यासह सहकार, पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा विभागाचा अाढावा घेताना श्री. खोत यांनी सध्या केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांच्या सद्यःस्थितीचाही या वेळी आढावा घेतला.
याविषयी माहिती देताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नीलेश राठोड यांनी सांगितले, की राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत जिल्ह्याचा आराखडा मंजूर आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात नऊ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असून यापैकी सहा कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे सांगितले.
या बैठकीत खोत यांनी जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचे नुकसान पंचनामे, फळपीक विमा योजना व कृषि विभागाच्या योजना, जिल्ह्यात सुरू असलेली तूर खरेदी, कृषि विभागामार्फत उन्नत शेती - समृद्ध शेतकरी अभियान व इतर योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. गावसाने यांनी याविषयी माहितीचे सादरीकरण केले.