अमरावती ः जिल्ह्यातील ७७ लघू सिंचन प्रकल्पांपैकी २९ पूर्णपणे कोरडे पडले, तर तीन उपसा सिंचन व बारा बंधाऱ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात एकूण ७७ लघू प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठवण क्षमता १७९.८२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गत हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने या प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही.
रब्बी हंगाम व पिण्याच्या पाणीपुरवठ्याची मागणी बघता या प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. उन्हाळ्यात तापमान अधिक असल्याने बाष्पीभवनाची गती वाढून पाणीसाठा कमी होत गेला.
सद्यःस्थितीत जिल्ह्यातील लघू प्रकल्पांत एकूण २२.९४ दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण ७७ लघू सिंचन प्रकल्पांपैकी २९ प्रकल्पांमधील पाणीसाठा शून्यावर आला आहे तर २२ प्रकल्पांत तो एक दलघमीपेक्षा कमी आहे. येत्या पंधरवाड्यात तोही संपेल अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन प्रकल्प व बारा बंधारे पण कोरडे पडले आहेत.
धारणी तालुक्यातील आठ, अंजनगावसूर्जी तालुक्यातील तीन, अचलपूर, अंजनगावसूर्जी, चांदूररेल्वे तालुक्यातील प्रत्येकी तीन, तिवसा तालुक्यातील पाच, मोर्शीतील एक, वरुडमधील दोन आणि चांदूरबाजारमधील एक प्रकल्प कोरडा आहे.
कोरडे पडलेले प्रकल्प : खतिजापूर, गोंडवाघोली, गोडविहीर, सावरपाणी, टोंगलफोडी, पिंपळगाव, बासलापूर, साखळी, टाकळी, सूर्यगंगा, दहीगाव, धानोरा, भिवापूर, जळका, आमदोरी, दाभेरी, बेलसावंगी, जमालपूर, रबांग, बोबदो, लवादा, सालर्डी, बेरदा, गंभेरी, जुटपाणी, मोगर्दा, चांदसुरा, शिवणगाव, खेलकुंड.
कोरडे पडलेले उपसा सिंचन प्रकल्प व बंधारे : दिया, धुलघाट, सोनखेड, मंगरुळ चव्हाळा, देवगाव, पाग, पाट, हाकल, खेड, चिंचगव्हाण, बेलसावंगी, पळसखेड, घुईखेड, तळेगाव.