औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई
औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९ वाड्यांना एप्रिलच्या मध्यातच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गाव - वाड्यांना ३०० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, पाणीपुरवठ्यासाठी २८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टॅंकरची सोय करण्यात आली असली तरी गरजेइतके पाणी ग्रामस्थांना मिळत नसल्याने विकत पाणी घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.
 
मराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील २४५ गावे व २९ वाड्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर गंगापूर व वैजापूर तालुक्‍यांतील ग्रामस्थांनी पाणीप्रश्‍नी नुकतीच धडक दिली होती.
 
गंगापूर तालुक्‍यात सर्वाधिक ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  त्यापाठोपाठ फूलंब्री तालुक्‍यातील ३७, सिल्लोडमधील ३५, वैजापूरमधील २९, खुल्ताबादमधील २३, कन्नडमधील १७, पैठण तालुक्‍यातील एका गाव वाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. फूलंब्री तालुक्‍यातील पाल येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, हा पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांतून एकदा होतो. शिवाय कुटुंबातील सदस्य संख्येनुसार पाणी मिळत नाही.
 
एका कुटुंबाला केवळ २०० लिटर पाणी मिळते. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.  दूषित पाण्याचा विचार न करता तळ गाठलेल्या विहिरींवरून मिळेल तसे पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. २०० लिटर पाण्यासाठी ५० ते ६० रूपये तर ट्रॅक्‍टरवरील एका टॅंकरसाठी ७०० ते ८०० रुपये ग्रामस्थांना मोजावे लागत आहेत. 
 
जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आता ४८ टक्‍क्‍यांवर आला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची अवस्था बिकट आहे. या प्रकल्पांमध्ये केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १० टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच प्रकल्पांमध्ये १५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. उपयुक्‍त पाणीसाठा शून्यावर आलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील लाहूकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापूरी, नारंगी बोरदहेगाव प्रकल्पांचा समावेश आहे. 
 
टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी पाच ते सात दिवसाला एका कुटुंबाला २०० लिटर पाणी मिळते. आठ सदस्य असलेल्या कुटुंबाने एवढ्या पाण्यावर कसे भागवावे. त्यामुळं एकतर विकतच्या पाण्यावर किंवा मिळेल तिथून पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. पाण्याने सारे अवघड करून टाकले आहे, असे पाल येथील ग्रामस्थ  हिरासिंग राजपूत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com