बुलडाणा : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, जिल्ह्यातील २९ लघू प्रकल्प कोरडे पडले आहे. परिणामी, आगामी काळात पाणी टंचाईस्थिती अधिक चिंताजनक होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ८१ लघू प्रकल्प असून, त्यापैकी हे २९ प्रकल्प कोरडे पडले आहेत.जिल्ह्यात या वर्षी कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता घटली होती. त्यामुळे जिल्ह्यात ७४८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित गावांमध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आतापासूनच संघर्ष करावा लागत आहे.
या वर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जो पाऊस झाला तो खंडित स्वरूपात तसेच जोमदार नसल्याने नदी-नाले वाहले नाहीत. यामुळे प्रकल्प भरले नव्हते. मागील वर्षात जेवढे पाणी होते ते आता संपायला लागले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. प्रकल्पांमधील जलसाठा कमी होत असल्याने या प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होत आहेत.
अशातच पांगरी-केसापूर, मातला, बोधेगाव, पाटोदा, अंचरवाडी-एक, कटवाडा, अंढेरा, शिवणी अरमाळ, गारडगाव, पिंप्री गवळी, बोरजवळा, जनुना, देऊळगाव कंडपाळ, खळेगाव, अंभोडा, बोरखेडी संत, हिरडव संत, चायगाव, सावंगी माळी-१, कोल्ही गोलार, वारी-२, व्याघ्रा, लोणवाडी, लांजूड, मांडवा, तांदूळवाडी, केशव शिवणी, विद्रुपा, ब्राह्मणवाड आदी प्रकल्प कोरडे पडले आहेत.
उर्वरित नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा आठ टक्के साठा शिल्लक राहिला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आता १८ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. कोरडे पडलेल्या २९ लघू प्रकल्पांशिवाय जे लघू प्रकल्प आहेत त्यांच्यातील साठा घटत आहे.
अशा परिस्थितीमुळे या प्रकल्पांवरील हंगामी पाणीपुरवठा योजना बंद करण्याची वेळ आली आहे. मातला लघू प्रकल्पावरून असलेली मासरूळ, शिवणी आरमाळ प्रकल्पावरील पाडळी शिंदे आणि इतर तीन गावे योजना तसेच अंढेरा गावाची पाणीपुरवठा योजना बंद करावी लागली. आगामी तीन महिने म्हणजे पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी प्रकल्पांमधून मिळणे अपेक्षित असताना मार्च अखेरच योजनांना घरघर सुरू झाली.