विटा, जि. सांगली ः खानापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. बारा गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. आठ पैकी भांबर्डे व लेंगरे तलाव कोरडे पडले आहेत. अन्य तलावांत अजूनही पाणीसाठा आहे. टंचाई असलेल्या गावात प्रशासनातर्फे विहिरी, बोअर अधिग्रहणाचे काम सुरू आहे. भांबर्डे, लेंगरे गावांनी टॅंकरची मागणी केली आहे.
कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या खानापूर तालुक्यात गेले दोन वर्षे पाणीटंचाई भेडसावत आहे. प्रशासनाने दोन वर्षे टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करून लोकांची तहान भागवली. दुष्काळी पट्टयातील गावांतून ‘टेंभू’चा कालवा गेल्याने सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाई थोडी सुसह्य आहे. परंतु खानापूर घाटमाथ्यावर अजूनही या योजनेची कामे अपुरी आहेत.
मध्यंतरी ‘टेंभू’च्या वितरिकेच्या निविदा मंजूर झाल्यात. वितरकांची कामे पूर्ण झाल्यास घाटमाथ्यावरील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. परंतु सद्य:स्थितीला घाटमाथ्यावरील लोकांपुढे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले. घाटमाथ्यावरील सुलतानगादे, हिवरे, पळशी, मेंगाणवाडी, जखीनवाडी, पोसेवाडी, बलवडी (खा), गोरेवाडी येथे तात्पुरत्या स्वरूपात बोअर, विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. त्याचे पाणी लोकांना पिण्यासाठी पुरवले जात आहे.
जोंधळखिंडी, देवनगर, सांगोले, भांबर्डे येथेही बोअर अधिग्रहण केले आहेत. या गावांसह अन्य गावांतही टंचाई तीव्र होणार आहे. बोअर, विहिरी अधिग्रहण केल्या असल्या तरी पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावात टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी आहे.
हिवरे, पळशी येथे मोठ्या प्रमाणात निर्यात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. अन्य गावातही द्राक्षासह अन्य बागायत क्षेत्र जास्त आहे. शेतीलाही पाणीटंचाईने ग्रासले आहे. द्राक्ष बागायतदार टॅंकरने पाणी विकत घेऊन द्राक्षबागा व अन्य फळपिके जगवित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.