सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना होत आला तरी मिरज पूर्व भाग अजून तहानलेलाच आहे. टंचाई दूर करण्यास पाझर तलाव, बंधारे भरून घ्यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरूच आहे.
यंदा तीव्र पाणीटंचाई भासणार असल्याने तलाव प्राधान्याने भरून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिले. त्याची कार्यवाही अद्यापही पाटबंधारे विभागाने केलेली दिसत नाही. त्यामुळे मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश तलाव कोरडेठाक आहेत.
काही तलावातून मंदगतीने पाणीपुरवठा सुरू आहे. आरगचा मुख्य आधार असलेला पाझर तलाव दहा टक्केही भरलेला नाही. मालगावच्या पाझर तलावातही अजून पाणी सोडलेले नाही. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘गाव बंद’चा इशारा दिल्याने काही प्रमाणात पुरवठा सुरू झाला. मात्र बेडग पाझर तलावातही पाणी सोडलेले नाही. कळंबीला तीन ते चार आठवड्यांतून एकदा विहिरीतून पाणी मिळते आहे. कळंबी, तानंग येथील पाझर तलाव आणि बांध भरून घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटही घेतली. अजून पाणी पोहोचलेले नाही. सलगरेत सांभारे वस्ती तलाव भरला. मात्र महत्त्वाचा असणारा कुरणे तलाव कोरडाच आहे. त्यातून सलगरे, चाबुकस्वारवाडी आणि कदमवाडीला पाणीपुरवठा होतो. तलाव कोरडा असल्याने या तीन गावांत पाण्यासाठी दाहीदिशा वणवण सुरू आहे.
भोसे, सोनी, सिद्धेवाडी, करोली, पाटगाव ही गावे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडणे अपेक्षित आहे. पण कार्यवाही झालेली नाही. खटाव येथील दळवीवाडी रस्त्यावरील पाझर तलावात पाण्याचा ठिपूसही नाही. लिंगनूर तलावातील साठा संपुष्टात येत आहे. लिंगनूर व खटावचा पाणीपुवठा कसाबसा सुरू आहे. एरंडोलीत आरग आणि खंडेराजुरी रस्त्यावरील तलाव भरून घेण्याचे काम मंदगतीने सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्व भागात कृत्रिम दुष्काळ निर्माण झाला आहे.