नाशिक : उन्हाचा पारा जसजसा वर चढत आहे, तसतसे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या १३२ गावे व वाड्यावस्त्यांची ११ तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली असून, त्यानुसार पाण्याची आवश्यकता असलेल्या ७ तालुक्यांमधील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या, वस्त्यांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
खरीप हंगामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रस्तावित व मंजूर गावातील पाणीटंचाईबाबत तपासणी पथक समित्या नेमून पडताळणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन याबाबत सूचना दिल्या.
तसेच पडताळणीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अभियंता लघू पाटबंधारे विभाग, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांची एकूण ११ तपासणी पथके तयार करण्यात आली. प्रस्तावित व मंजूर टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे निर्देश या पथकांना दिले.
मंजूर ५५ गावे व ४२ वाड्या असे एकूण ९७ तर प्रस्तावित २० गावे व १५ वाड्या, असे एकूण १३२ गावे, वाड्या, वस्त्यांची पडताळणी समितीने तपासणी केली. तपासणी पथकाच्या पाहणी अहवालानुसार मंजूर व प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांमधील ४ गावे वगळता इतर सर्व गाव व वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार जिल्ह्यात सद्यःस्थितीत ७ तालुक्यांतील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या-वस्त्यांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईने बिकट स्वरूप धारण केल्यास प्रशासनाने उपाययोजनांचे नियोजन केले असून, प्रत्येक टंचाईग्रस्त गावाला पाणी पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.