तासगाव, जि. सांगली ः तालुक्यातील येरळा नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येरळेत ताकारी, आरफळचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी या गावांतून होत आहे. अर्ज, विनंत्या करून व निवेदने देऊनही प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नदीपात्रातील विहिरींची पाणीपातळी २५ फुटांखाली गेली आहे. दोन महिन्यांपासून येरळा नदी कोरडी पडली आहे.
येरळा पात्रात तासगाव तालुक्यातील राजापूरपासून निमणीपर्यंत शेकडो विहिरी आहेत. नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनाही याच विहिरींवर अवलंबून आहेत. मात्र, सध्या येरळा पात्र कोरडे पडल्याने राजापूर, तुर्ची, ढवळी या गावांतून शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. पाणी योजना येरळा नदीतील पाण्यावर सुरू आहेत. मात्र, पात्रात पाणीच नसल्याने चक्क नदीकाठच्या गावांत एक दिवसाआड आणि अपुरा पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.
काही वर्षे सलग येरळा बारमाही वाहिल्याने नदीकाठी बागायतीही मोठ्या प्रमाणात वाढली. ऊस आणि द्राक्षाचे क्षेत्र लक्षणीय वाढले. दुर्दैवाने दोन वर्षे केवळ पावसाळ्यात पाणी अशी पुन्हा स्थिती निर्माण झाली. ताकारी आणि आरफळचे पाणी वाझर बंधाऱ्यापर्यंत सोडले जाते. वाझर बंधारा भरल्यानंतर एक फळी काढून खालील गावांसाठी पाणी सोडण्यात येते. हे पाणी निमणीपर्यंत पोचते न पोचते तोच बंद होते.
परिणामी, या पाण्यावर कशीबशी शेती तग धरून आहे. येरळा काठावरील गावांतील विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. येरळा पात्रातील विहिरी तर पंधरा-वीस फुटांखाली गेल्या आहेत. द्राक्ष हंगाम सुरू आहे. त्यानंतर पाण्याची गरज भासणार आहे. तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तीव्र आंदोलनाचाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.