अकोला ः गेल्या वर्षी अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने व धरण प्रकल्प न भरल्याने पाणीटंचाईचा मोठा फटका नागरिकांना बसत अाहे. त्यामुळे सध्या १३१ टँकरद्वारे या तीन जिल्ह्यांतील गावांना पाणी पुरवले जात अाहे. अागामी अाठवडाभरात टँकरची संख्या अाणखी वाढण्याची शक्यता अाहे.
गेल्या मोसमात या तीनही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. शिवाय जो पाऊस झाला तोसुद्धा कमी दिवसात पडला. बुलडाण्यात ६६४.५ मिमी (९९टक्के), अकोल्यात ५५०मिमी (७९ टक्के) अाणि वाशीममध्ये ५८१.९ मिमी (७३ टक्के) पाऊस झाला. बुलडाणा व अकोल्यात ३७ दिवस तर वाशीममध्ये २७ दिवसच पाऊस झाला होता.या कमी पावसामुळे तीन जिल्ह्यात कुठलाच प्रकल्प १०० टक्के भरला नाही. परिणामी दिवाळीनंतर पाणी समस्या उद्भवली.
सध्या या टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत अाहे. या विभागात दररोज तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान राहत असल्याने पाण्याची मागणी त्याच तुलनेने होत अाहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विहिरींचे खोलीकरण, कूपनलिका घेणे, टँकर अशा उपाययोजना सुरू केल्या अाहेत.
सद्यःस्थितीत अकोला जिल्ह्यात ५७, बुलडाण्यात ५८ अाणि वाशीममध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू अाहे. येत्या अाठवड्यात अाणखी टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरने पाणी पुरवठा करण्यावर अधिक खर्च होत अाहे. ‘जलयुक्त’ची कामे मागील दोन वर्षांत अधिक झाली. परंतु पाऊस न पडल्याने या कामांचे परिणाम तितकेसे दिसून अालेले नाहीत.
या भागातील प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत अाहे. दरदिवसाला पाणी पातळी घटत अाहे. बहुतांश लघू, मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला अाहे. पाणीटंचाईची झळ प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात सर्वाधिक सहन करावी लागत अाहे.