माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस नसल्याने माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतील अनेक गावांत पाणीटंचाई वाढत आहे. सध्या या तीन तालुक्‍यांतील १८ गावे व ८३ वाड्या-वस्त्यांवर १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही तालुक्यांत ओला तर दुसऱ्या बाजूस कोरडया दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांमध्ये पाण्यावाचून पिके वाळल्याने उत्पादनात घट झाली आहे. रब्बी हंगाम तोंडावर आला असताना पाणीटंचाईत होत असलेली वाढ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. माण, खटाव व कोरेगावमधील काही गावांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. या तीन तालुक्यांतील१८ गावे व ८३ वाड्या-वस्त्यांवरील २६ हजार ६४२ नागरिकांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्‍याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा सहन कराव्या लागत आहे.

या तालुक्‍यात सर्वाधिक १५ टॅंकरद्वारे १४ गावे आणि ८० वाड्यावस्त्यांवरील २२ हजार २४९ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यातील तीन गावे, तीन वाड्यावस्त्यांवरील ३११० नागरिकांना दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यातील एका गावातील १२८३ नागरिकांना एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. संरक्षित पाण्यासाठी तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३, खटावमधील एका विहिरीचा समावेश आहे. अॅाक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या १३ होती. आता त्यात वाढ होऊन ही संख्या १७ वर  गेली आहे. सध्या पाऊसही नसल्याने पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com