सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या दमदार पावसामुळे ३९ गावे, तर १२५ वाड्यावस्त्यांवरील पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. या गावात सुरू असलेले २९ टॅंकर बंद करण्यात आले आहेत. सध्या १० टॅंकरद्वारे १६ गावे व ६३ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात गत सप्ताहात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले, तसेच रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसदेखील फायदा झाला आहे. गतसप्ताहात सोमवारी (ता.१८) जिल्ह्यात ३९ टॅंकरद्वारे ५५ गावे व १८८ वाड्यावस्त्यांवरील ९१ हजार ३९९ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला होता. मात्र, सोमवारी (ता.२५) जिल्ह्यातील १० टॅंकरद्वारे १६ गावे ६३ वाड्यावस्त्यांवरील २४ हजार १६६ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे ३९ गावे १२५ वाड्यावस्त्यांवरील पाणीटंचाई दूर झाली असल्याने प्रशासनाकडून टॅंकरच्या संख्येत घट करण्यात आली आहे.
सध्या माणमधील ११ गावे ५० वाड्यावस्त्यांवर सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात तीन गावे व १३ वाड्यावस्त्यांवर दोन, तर कोरेगाव तालुक्यात दोन गावांत दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाल्यामुळे टॅंकर बंद करण्यात आले आहेत.