औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ पाणीसाठ्यांमध्ये नोव्हेंबरअखेर केवळ ५९.६९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यंदाचा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे पाणीसाठ्याबाबत ‘मागचं वर्ष बरं होतं’ अशीच काहीशी स्थिती आहे.
मराठवाड्यात एकूण ८६४ मोठे, मध्यम, लघू बंधारे असून, त्यांच्या साठवणूक क्षमतेनुसार त्यामध्ये नोव्हेंबरअखेर ५९.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांमधील ६१.६३ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांतील ६२.४८ टक्के, ७४३ लघू प्रकल्पांत ४९.४० टक्के, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ७३.४७ टक्के, तेरणा, मांजरा व रेणा नद्यांवरील २४ बंधाऱ्यांमध्ये साठवण क्षमतेच्या तुलनेत असलेल्या ७४.३० टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा चाळीस दिवसांत तब्बल सात टक्क्यांनी घटला आहे. गत आठवड्यात जायकवाडीत २०७९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा होता; तो ५६ दशलक्ष घनमीटरने घटून २०२३ दशलक्ष घनमीटरवर आला आहे. येलदरी प्रकल्पातील १३ टक्के, ऊर्ध्व पेनगंगामधील १४ टक्के व निम्न मनारमधील २० टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा अपवाद वगळता उर्वरित आठही मोठ्या प्रकल्पांमध्ये ३७ ते ९६ टक्क्यांदरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे.
हिंगोली, परभणी, नांदेड, जालना व औरंगाबाद या सहा जिल्ह्यांतील २८४ लघू प्रकल्पांमधील उपयूक्त पाणीसाठा त्यांच्या साठवण क्षमतेच्या तुलनेत २७ ते ३८ टक्क्यांदरम्यानच आहे.