औरंगाबाद : मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. खासकरून औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिकतीव्र आहेत. त्यापाठोपाठ जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यातही टंचाई वाढताना दिसत आहे. मराठवाड्यातील १९१ गावांना २२५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १५१ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक ६५ गावे गंगापूर तालुक्यातील आहे. त्यापाठोपाठ फूलंब्रीमधील ३० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिल्लोड तालुक्यातील २०, खुल्ताबाद तालुक्यातील १२, कन्नड, वैजापूर व औरंगाबाद तालुक्यातील प्रत्येकी ८ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ७१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून फूलंब्री तालुक्यात ३९, औरंगाबाद तालुक्यात १६, सिल्लोड तालुक्यात २९, वैजापूर, खुल्ताबाद तालुक्यात प्रत्येकी ९, कन्नड तालुक्यात ७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ६, जाफ्राबाद तालुक्यातील ८, परतूर तालुक्यातील १ मिळून १५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी १८ टॅंकरची सोय करण्यात आली असून त्यापैकी ८ टॅंकर भोकरदन तालुक्यात, ९ टॅंकर जाफ्राबाद तालुक्यात तर १ टॅंकर परतूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा करत आहेत.
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील ३ व पूर्णा तालुक्यातील १ मिळून चार गावांना व पालम तालुक्यातील एका वाडीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परभणीतील चार गावे व एका वाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी ६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील टंचाईचा सामना करणाऱ्या १२ गाव वाड्यांमध्ये नांदेड तालुक्यातील ५ गावे व १ वाडी, भोकर, हदगाव, माहूर तालुक्यातील प्रत्येकी १ वाडी, मुखेड तालुक्यातील ३ गावे व ४ वाड्या, किनवट तालुक्यातील २ गावे, माहूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडमधील बारा गाव - वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील चौदा गावांचे टॅंकरसाठीचे प्रस्ताव त्रुटीमुळे पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.