कमाल, किमान तापमान वाढेल

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

काश्मीर खोऱ्यात तसेच राजस्थान आणि मध्य भारतापासून उत्तर भारतापर्यंत १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी राहील. तर महाराष्ट्राच्या मध्यावर उत्तर-दक्षिण दिशेने १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील तसेच ईशान्य भारतावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते या नियमाने नैऋत्येकडून तसेच ईशान्येकडून वारे मध्य व उत्तर भारताच्या दिशेने वाहतील. अरबी समुद्रावर, हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे समुद्रावरून भारताच्या पृष्ठभागाकडे वाहणारे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील.

२९ एप्रिल रविवार रोजी हीच स्थिती कायम राहील. याच दरम्यान हिंदी महासागरात १० अंश दक्षिण अक्षांशावर व ९० अंश रेखांशावर एका चक्रीवादळाची निर्मिती होत असून त्याचा प्रवास निश्‍चितपणे उत्तर दिशेने होईल. परंतु त्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागेल. ३० एप्रिल सोमवार रोजी काश्‍मीर खोऱ्यातील आणि राजस्थान वरील हवेचे दाब कमी होतील आणि ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी होतील. तर गुजरातच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य असून, महाराष्ट्रावरील हवेचे दाबही १००६ हेप्टापास्कल इतके कमी होतील. संपूर्ण भारतावरील हवेचे दाब कमी होत आहेत. १ मे मंगळवार रोजी हीच स्थिती कायम राहील. तशीच स्थिती २ मे रोजी राहील. ३ मे गुरुवार रोजी काश्‍मीर खोऱ्यात केवळ १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील त्याचप्रमाणे मध्य व उत्तर भारतात तसेच गुजरात व महाराष्ट्रातही हवेचे दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. संपूर्ण बंगालचा उपसागर व अरबी समुद्राच्या पश्‍चिम किनारपट्टीलगतच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. काश्मीर खोऱ्यात व हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात पावसाची शक्‍यता असून महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ३० मे रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. कोकण ः ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल तर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि रत्नागिरी जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९४ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ३७ ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग रायगड व ठाणे जिल्ह्यात ताशी ५ किलोमीटर राहील तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७ ते ८ किलोमीटर राहील. रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील तर उर्वरित जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. उत्तर महाराष्ट्र ः धुळे व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ टक्के राहील, तर धुळे जिल्ह्यात ६४ टक्के राहील आणि नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात ७१ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ११ ते १२ टक्के राहील आणि धुळे व नाशिक जिल्ह्यांत २१ टक्के राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २० किलोमीटर राहील तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ८ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. मराठवाडा ः नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील तर उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस तर लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत किमान तापमान उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के राहील तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३० टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात २० ते २४ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १७ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग जालना व परभणी जिल्ह्यांत ताशी १४ किलोमीटर, बीड जिल्ह्यात ताशी १६ किलोमीटर, हिंगोली जिल्ह्यात ताशी १३ किलोमीटर तसेच लातूर व नांदेड जिल्ह्यांत ताशी ५ ते ८ किलोमीटर राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात व औरंगाबाद जिल्ह्यात १० ते ११ किलोमीटर ताशी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ ः अकोला जिल्ह्यात व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात ते ४३ ते ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ३१ टक्के तर अकोला व वाशिम जिल्ह्यांत ३५ टक्के राहील तर बुलडाणा जिल्ह्यात ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला, अमरावती व वाशिम जिल्ह्यांत १७ ते १९ टक्के राहील तर बुलडाणा जिल्ह्यात २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. मध्य विदर्भ ः वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ जिल्ह्यात ते ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३१ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. पूर्व विदर्भ ः उचांकी तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत भंडारा जिल्ह्यात राहील तर ४५ अंश सेल्सिअस चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत राहील व ४३ अंश सेल्सिअस गडचिरोली जिल्ह्यात राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ टक्के राहील तर उर्वरित भंडारा जिल्ह्यात ३५ टक्के आणि गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत ४२ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात २३ टक्के व उर्वरित जिल्ह्यात ती १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. सातारा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस आणि उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ते ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के राहील. तर सातारा जिल्ह्यात ५५ टक्के राहील. पुणे जिल्ह्यात ५४ टक्के राहील व उर्वरित जिल्ह्यात ३३ ते ४१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १९ टक्के सर्वच जिल्ह्यात राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सातारा व पुणे जिल्ह्यात ४ ते ५ किलोमीटर राहील तर नगर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १० ते १३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर जिल्ह्यात नैऋत्येकडून तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. कृषी सल्ला ः

  • उन्हाळी मिरचीची फूलगळ होऊ नये म्हणून ८ दिवसाचे अंतराने पाणी द्यावे.
  • जनावरांना मुबलक प्रमाणात हिरवा चारा द्यावा. सावलीत बांधून दिवसातून ४ ते ५ वेळा पाणी द्यावे.
  • पूर्वमशागतीची कामे सकाळी किंवा सायंकाळी करावीत.
  •  (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com