उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा राज्यात प्रभाव

हवामान
हवामान
पुणे  ः उत्तर भारतातील हिमालय, दिल्ली, चंडीगड, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या भागांत थंडीची लाट आहे. या लाटेमुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी काही प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तयार झालेले ढगाळ हवामान विरून गेले आहे. सध्या राज्यात पुन्हा कोरडे हवामान आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह वाहत असल्याने येत्या काही दिवस थंडी अशीच कमीअधिक होण्याची शक्यता आहे. मात्र किमान तापमानात घट झाली असली, तरी काही प्रमाणात कमाल तापमानात किंचित वाढ होण्यास सुरवात झाली आहे. दुपारी चांगलाच उन्हाचा चटका नागरिकांना जाणवू लागला आहे. 
 
सध्या अरबी समुद्रावरून बाष्प कोकणातील काही भागाकडे वाहत आहे. कोकणातील थंडीत चढउतार होत आहे. मुंबई, रत्नागिरी येथे थंडीत किंचित वाढली आहे. अलिबाग, भिरा, डहाणू येथे थंडी कमी झाली आहे. भिरा येथे १५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत येथील थंडी कमीअधिक होणार असून, पुढील आठवड्यापासून थंडी गायब होण्यास सुरवात होईल. 
 
उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मध्य महाराष्ट्रातील काही भाग व खानदेश या भागात किंचित थंडी वाढली आहे. निफाड येथे सर्वांत कमी ७.८ अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तामपानात किंचित वाढ झाली आहे. 
 
मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. उस्मानाबादमध्ये किमान तापमान सरासरीएवढे होते. परभणी शहरामध्ये १०.९ अंश सेल्सिअसची एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. 
 
विदर्भातील बहुतांशी भागात आर्द्रता कमी होत असल्याने गेल्या दोन दिवसापासून थंडी कमी होण्यास सुरवात झाली आहे. सध्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा दहा अंशांच्या वर गेला आहे. मात्र सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घट झाली असली, तरी गोंदिया येथे १०.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 
 
गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १५.८ (-१), रत्नागिरी १७.१(-२), भिरा १५.०, पुणे ९.२ (-२), नगर ८.४ (-५), जळगाव ८.७ (-४), कोल्हापूर १५.६, महाबळेश्वर १५.५ (२), मालेगाव १२.५ (१), नाशिक ९.४ (-१), निफाड ७.८, सांगली १३.५ (-१), सातारा १०.५ (-३), सोलापूर १३.१ (-४), औरंगाबाद १२.० (-१),  परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) ७.५, परभणी शहर १०.९ (-५), नांदेड १२.० (-२), अकोला १२.४ (-३), अमरावती १३.२ (-३), चंद्रपूर १२.०(-४), नागपूर १०.२ (-४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com