गेल्या आठवड्यात बेंचमार्क नाशिक बाजारात ५५ प्रतिकिलो दराने लिफ्टिंग झाले. मागील आठवड्यातील ६५ रुपये पातळीवरून बाजार पुन्हा दहा रुपयांनी उतरला आहे. पुणे विभागात अंड्यांचे बाजारभाव देखील गेल्या आठवड्यातील पातळीवरुन सुमारे दहा टक्क्यांनी नरमले आहेत.
पुणेस्थित योजना पोल्ट्री संचालक राजू भोसले म्हणाले, की गेल्या महिनाभरापासून रविवारचा चिकनचा खप रोडावत चालल्याचे निरीक्षण आहे. सरासरी खपाच्या तुलनेत १५ टक्के कमी विक्री होत आहे. महिनाभरापूर्वी रविवारी या सर्वाधिक खपाच्या दिवशी दुकानासमोरील रांगा हटत नव्हत्या. मात्र, चालू महिन्यातील सर्व रविवारी खरेदीत नेहमीसारख्या रांगा दिसल्या नाहीत. अजून उन्हाळ्याचा प्रभाव नसला तरी परीक्षांचा हंगाम सुरू झाल्यामुळे एकूण संस्थात्मक खपात घट येऊ शकते." योजना पोल्ट्रीद्वारेत थेट चिकन विक्री केली जाते.
पोल्ट्री उद्योजक पांडुरंग सांडभोर म्हणाले, की पुण्यासह महाराष्ट्रात चिकन विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विक्री विभागली गेलीय. या प्रक्रियेत दुकानावरची विक्री कमी दिसत असली तरी ठोक विक्रीत नेहमीप्रमाणे माल जातोय. मधल्या काळात काही नकारात्मक बातम्यांमुळे विक्री कमी झाली होती. मात्र, आता खप पूर्ववत झाला आहे.
ते म्हणाले, की मागील आठवड्यातील बाजारातील वाढ-घट ही मागणी पुरवठ्याच्या खेळामुळे झाली आहे. यातील सकारात्मक बाब अशी की, किरकोळ विक्रीतील स्पर्धेमुळे मोठ्या शहरातील बोर्ड रेट हलताना दिसत आहेत. ज्या ज्या वेळी लिफ्टिंग रेट ६० रुपये प्रतिकिलोच्या खाली जातो, त्या त्या वेळी किरकोळीचे दर कमी होतात. त्या माध्यमातून चिकनचा खप १५ ते २० टक्के वाढतो. येत्या दिवसांत बाजारभावात पुन्हा सुधारणा होईल.
फलटण विभागात देशी (डीपी) कोंबडीचा लिफ्टिंग दर ११० रुपये प्रतिकिलो आहे. ग्रामीण भागात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे देशी पक्ष्यांचा खप आणि दर टिकून राहतील किंवा त्यात सुधारणाही होऊ शकेल, असे श्री. सांडभोर यांनी सांगितले.
अमरावती येथील आगत हॅजरिजचे संचालक सुनील झोंबाडे म्हणाले, की विदर्भातील ग्रामीण व निमशहरी भागातील किरकोळ विक्री नेहमीप्रमाणे सुरळीत आहे. नाशिक विभागातील दर कमी झाल्याने त्याचा प्रभाव विदर्भातील बाजारावरही झाला आहे. सध्याच्या मंदीमुळे नवे प्लेसमेंट थोडे घटले आहे. याशिवाय अमरावती विभागात कमी प्रमाणात पाऊस झाला असून, त्या अनुषंगाने विदर्भात भूजलाची उपलब्धता कमी राहणार असल्यानेही प्लेसमेंटवाढीबाबत शेतकरी उत्साही नाहीत.