सव्वा लाख हेक्‍टरवर गहू, हरभऱ्याचे बीजोत्पादन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर: शेतकरी स्तरावर बियाणे बदलात वाढ व्हावी, यासाठी कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)तर्फे राज्यातील सत्तावीस जिल्ह्यामध्ये रब्बीत गहू व हरभऱ्यासाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहे.

त्यासाठी गव्हाचे ८० हजार क्विंटल, तर हरभऱ्याचे ३३ हजार तीनशे क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून अनुदानावर वितरित केले जाणार आहेत. दोन्ही पिकांचे मिळून साधारण एक लाख २४ हजार चारशे हेक्‍टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे.

रब्बीत केल्या जाणाऱ्या गहू, हरभऱ्याच्या पेरणीत गव्हाचे बियाणे बदलाचे प्रमाण ३५.८५ टक्के, तर हरभऱ्याचे प्रमाण १८.२३ टक्के आहे. हरभरा व गव्हाच्या क्षेत्राचा विचार केला, तर हे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे त्यात वाढ होण्यासाठी कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)तर्फे ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो.

यंदा राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये साधारण सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी गव्हाचे ८० हजार क्विंटल व हरभऱ्याचे ३३ हजार ३०० क्विंटल बियाणे वितरीत केले जाणार आहेत. गहू शेतकऱ्यांना पन्नास टक्के अथवा प्रतिक्विंटल १६०० रुपये अनुदानावर, तर हरभरा साठ टक्‍के किंवा प्रतिक्विंटल ४८०० रुपये अनुदान मिळेल. कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांची सर्वसाधारण व अनुसूचित जातीचे प्रत्येकी ३५ टक्के तर अनुसूचित जमातीचे ३० टक्के प्रमाण निवड करतील.

एका लाभार्थ्यांना एक एकरपर्यंतच अनुदानीत बियाण्यांचा लाभ मिळेल. राज्यात सर्वाधिक बियाणे नगर जिल्ह्यामध्ये वितरित केले जाणार आहे.

जिल्हानिहाय गव्हाचे व कंसात हरभऱ्याचे वितरित होणारे बियाणे (क्विंटलमध्ये) नाशिक ः ६८३५ (१५९), धुळे ः २७८९ (३३३), नंदुरबार ः १७७१ (११७), जळगाव ः ६१८० (२८४१), नगर ः १४८०० (३३७३), पुणे ः ३००० (२४४), सोलापुर ः ६८४२ (३५९), सातारा ः १६०६ (२४१), सांगली ः १४७० (५५६), कोल्हापूर ः ६९१ (१८३), औरंगाबाद ः ४६०९ (३४०), जालना ः ३०६३ (६६३), बीड ः ५७१० (२८३), लातूर ः १८८० (५४०५), परभणी ः ११०७ (७२५), हिंगोली ः ५३३ (६२९), उस्मानाबाद ः ११५० (१९२१), नांदेड ः ८५८ (११८५), बुलडाणा ः ९५५ (१३५२), अकोला ः १५६५ (२८३३), वाशीम ः ८४२ (७७३), अमरावती ः १२६० (२३७२), यवतमाळ ः १२८० (२०२०), वर्धा ः १४६२ (१०००). नागपूर ः ६७४७ (८२०), भंडारा ः ३९६ (१०३), चंद्रपूर ः ५९९ (६७०).

कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व कृषी विभाग बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहेत. गावपातळीवर पुढील हंगामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे हा त्यामागचे हेतू आहे. या उपक्रमामुळे गहू, हरभऱ्याचे बियाणे मुबलक प्रमाणात तयार होतील. - सुनील दौंड, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com