कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च रोखता येणार नाही

कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च रोखता येणार नाही
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च रोखता येणार नाही

नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २० फेब्रुवारीपासून नाशिकहून काढण्यात येत असलेला लॉंग मार्च रोखण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली आहे. नगर येथे लॉंग मार्च काढण्याची तयारी करण्यासाठी १३ फेब्रुवारीला शेतकऱ्यांची परिषद घेऊन निवेदन दिले म्हणून किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लॉंग मार्च रोखता येणार नाही, असे किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.    अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, सुनील मालुसरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, किसान सभा सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. लोकशाही चौकटीत शांतता, आत्मक्लेश व सत्याग्रही मार्गाने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला दडपून टाकण्याचा सरकारचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. लॉंग मार्चची तयारी करण्यासाठी परिषद घेतल्याने कोठेही शांततेचा भंग झालेला नव्हता. परिषद घेत असल्याची पूर्वकल्पना किसान सभेने पोलिसांना अगोदरच दिली होती. परिषदेनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल, असेही पोलिसांना अगोदरच कळविले होते. कार्यक्रम शांततेत करा, आमची त्याला काहीच हरकत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. ठरल्याप्रमाणे परिषद अत्यंत शांततेत पार पडली. निवेदन देण्याचा कार्यक्रमही अत्यंत शांततेत संपन्न झाला. असे असताना नंतर कोणाच्या इशाऱ्यामुळे या केसेस दाखल झाल्या हे राज्यभरातील शेतकऱ्यांना नक्कीच चांगले माहीत आहे.  किसान सभा व राज्यभरातील शेतकरी या दडपशाहीचा कसून मुकाबला करतील. शेतकऱ्यांचा हा दुसरा लॉंग मार्च अभूतपूर्व ताकदीने यशस्वी करतील. दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक येथील मुंबई नाका येथून लॉंग मार्चला सुरुवात होईल. सात दिवस पायी चालून हा लॉंग मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकेल. मागील लॉंग मार्चपेक्षा या लॉंग मार्चमध्ये दुप्पट शेतकरी सामील होतील. राज्यभरातील २३ जिल्ह्यांत लॉंग मार्चची जोरदार तयारी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर या तयारीला नक्कीच आणखी वेग येईल.  भीषण दुष्काळ व सिंचनाचे प्रश्न, जमिनीचे हक्क, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकरीहिताची पीक विमा योजना, शेतकरी-शेतमजुरांना व निराधारांना वाढीव पेन्शन, रेशन व अन्न अधिकार यासह सर्व शेतकरी मागण्या धसास लावल्याशिवाय राज्यभरातील शेतकरी आता स्वस्थ बसणार नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com