जालना : मराठवाड्यासह राज्यातील कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाबाबत मंगळवारी (ता. ३०) स्थानिक कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. सहभागी तज्ज्ञांनी उपस्थित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. पुढील हंगामात कपाशीचे पीक घेता यावे, म्हणून यंदा फरदड न घेता पऱ्हाटी निर्मूलन सप्ताह राबविण्याचे आवाहनही या वेळी तज्ज्ञांनी केले.
जालना येथील कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्या संयुक्त विद्यमाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळीविषयी जागृती व व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर, कृषी आयुक्तालयातील माजी संचालक डॉ. एस. एल. जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, ‘वनामकृवी’चे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. एस. बेग, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, विषय विशेषज्ञ प्रा. ए. जी. मिटकरी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. नेरकर यांच्यासह विजयअण्णा बोराडे, डॉ. एस. एल जाधव आदींनी आपल्या अनुभवातून गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. झंवर यांनी गुलाबी बोंड अळीच्या येत्या काळातील नियंत्रणाविषयी माहिती दिली.
प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन अजय मिटकरी यांनी केले. आभार आत्माचे उपसंचालक हादगावकर यांनी मानले. या कार्यशाळेत सातशे कापूस उत्पादक सहभागी झाले होते.