यवतमाळ जिल्हा बॅंक पीककर्ज देणार फक्‍त दहा हजार रुपये

पीककर्ज म्हणून मिळणार  फक्‍त दहा हजार रुपये
पीककर्ज म्हणून मिळणार फक्‍त दहा हजार रुपये

यवतमाळ ः आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून या हंगामात शेतकऱ्यांना प्रत्येकी केवळ दहा ते १५ हजार रुपयांचे पीककर्ज दिले जाणार आहे. सातत्याने थकबाकीदार राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १ लाख ९८ हजार सभासद असलेल्या या  बॅंकेला शासनाकडून ५६० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने बॅंकेने हे पाऊल उचलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.  ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, शासनाच्या कर्जमाफीचे थोडक्‍यात असेच वर्णन करता येईल. राज्य शासनाने कर्जमाफी दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची खाती निल झाली. परंतु बॅंकांनी आपल्या स्तरावर धोरण ठरवित कर्जमाफी ते कर्जमाफी असे थकीतदार असलेल्या   शेतकऱ्यांना या हंगामात केवळ दहा हजार रुपये पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील बहुतांश बॅंकांनी असेच धोरण निश्‍चित केल्याचे वृत्त आहे. यवतमाळ जिल्हा बॅंकेने मात्र याबाबत अधिकृतपणे पुढाकार घेतला आहे. यवतमाळ जिल्हा बॅंकेचे ११०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. बॅंकेला कर्जमाफीपोटी ५६० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळाला. तो तोकडा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बॅंकेने आपल्यास्तरावर धोरण आखत पीककर्ज वाटपाचे नियोजन केले आहे.  बॅंकेकडून प्राप्त माहितीनुसार, ५६० कोटी रुपयांपैकी १८० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप या हंगामात करण्यात आले. २२ हजार शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यात आले आहे. त्यामध्ये बहुतांश नियमित कर्जदार आहेत. पीककर्ज नियमानुसार वाटपाकरिता १२०० ते १३०० कोटी बॅंकेला लागतील.  असे मिळणार पीककर्ज

  • २००८-०९ मधील माफीनंतर बॅंकेकडे आलेच नाही त्यांना १० हजार रुपये.
  • ज्यांनी दहा-पंधरा वर्षांत एक-दोन वर्षे भरले त्यांना १५ हजार रुपये. 
  • एकाच वेळी भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल ८० हजार रुपये असेल तर त्यांना दीडपट १ लाख २० हजार रुपये.  
  • असे मिळते पीककर्ज

  •  कापूस ः ४८ हजार हेक्‍टरी बागायती, जिरायती ४० हजार रुपये हेक्‍टरी
  •  सोयाबीन ः ४८ हजार हेक्‍टरी बागायती, जिरायती ४० हजार रुपये हेक्‍टरी  
  • कर्जासंदर्भातील या प्रक्रियेत राज्य शासनाने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागेल आणि शेतकरी सावकाराचे उंबरठे झिजवतील. त्याचे दुष्परिणाम आत्महत्यांच्या माध्यमातून पुढे येतील.  - मनीष जाधव, प्रयोगशील शेतकरी,  वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ

    पीककर्ज म्हणून १० ते १५ हजार रुपये दिले जातील, ज्या शेतकऱ्यांना मान्य नसेल त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन ही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली जातील. अशा शेतकऱ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकांना जोडण्यास सांगितले जाईल. - अरविंद देशपांडे,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक यवतमाळ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com