यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर अनेकांना दृष्टिदोष झाला आहे. आजही अनेकांवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यानंतरही प्रकृती स्थिर असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याची माहिती घेण्यासाठी मुंबई, नागपूर, चंद्रपूर व अकोला येथील पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील पथक यवतमाळमध्ये रविवारी (ता.१५) दाखल झाले आहे.
फवारणीतून विषबाधा झाल्याने आजपर्यंत २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सातशेवर रुग्ण बाधित झाले होते. त्या सर्व रुग्णांवर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. दाखल झालेल्या रुग्णांपैकी अनेकांची प्रकृती स्थिर आहे. मात्र शुक्रवारी (ता.१३) व शनिवारी (ता. १४) दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णांची प्रकृती स्थिर होती. प्रकृती स्थिर असताना पहाटे आणखी एका शेतकऱ्याचे निधन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आली.
प्रकृती स्थिर असल्यानंतरही निधन झाल्याने डॉ. देशमुख यांनी मंत्रालयातील अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी इतर शासकीय महाविद्यालयतील डॉक्टरांचे पथक जिल्ह्यात माहिती घेण्याकरिता पाठविण्यात यावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केली असून, के.एम. मेडिकल कॉलेज, मुंबई, नायर मेडिकल कॉलेज मुबंई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, चंद्रपूर व अकोला या पाच ठिकाणच्या तज्ज्ञ डॉक्टराचे पथक यवतमाळमध्ये दाखल झाले.
फवारणीमुळे बाधित व मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता संबंधित सर्व विभागांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यात जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित राहतात. याशिवाय निवासी उपजिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी आदी अनेक विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश असतो.