पुणे ः शासकीय कार्यालयांतील कामांचा निपटारा वेगाने हाेण्यासाठी संपूर्ण राज्यभरात झिरो पेंडन्सी राबविणार अाहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध केली जाईल. यानंतर विविध विभागांमध्ये झिराे पेंडन्सीची स्पर्धा घेतली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ७) केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, राहुल कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘शासकीय कार्यालयांतील झिराे पेंडन्सीचा आदर्श तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी घालून दिला आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये झिरो पेंडन्सीच्या माध्यमातून लाखो प्रकरणे निपटारत निघत असून, विविध विभागांमध्ये झिराे पेंडन्सी उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येईल.’’
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘समाजाची कामे तत्काळ हाेण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गतीने आणि संवदेनशीलपणे काम करण्याची गरज आहे.’’