कोल्हापूर: पीक फेरपालटीचा अभाव आणि एकाच क्षेत्रात वर्षभर सातत्याने पिके घेतल्याचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्यातील शेतजमिनीवर होत आहे. जमिनीमध्ये लोह व जस्ताच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. परिणामी पीक उत्पादन घटू लागले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास पीक उत्पादन घटीचा मोठा धोका शेतकऱ्यांच्या समोर आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात आणि पूर्व भागात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुके डोंगराळ आहेत. डोंगराळ भागातील जमिनीत आंतरपिकांचा अभाव आणि पारंपरिक पद्धतीने तीच तीच पिके घेतल्याने जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात घटत आहे.
जमिनीच्या सुपीकतेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांच्याबरोबर लोह, तांबे, मंगल, जस्त आदी घटकांचे प्रमाण महत्त्वाचे ठरते. बारा तालुक्यांच्या जमीन आरोग्याचा आढावा घेतल्यास नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण चांगले आहे. जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण २.१४ टक्के, स्फुरद १.४० टक्के, तर पालाश २.४० टक्के आहे.
जिल्ह्यातील एकूण कमतरतेचा विचार केल्यास तांबे ०.३६ टक्के, लोह २५ टक्के आणि जस्ताची तब्बल ३२ टक्के इतकी कमतरता आहे. जोराच्या पावसामुळे जमिनीतील जस्ताचा मोठ्या प्रमाणात निचरा झाल्याने कमतरता वाढली आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेबरोबरीने जमिनीच्या सुपीकतेमध्ये महत्त्वाची बाब असलेल्या सेंद्रिय कर्बाची कमतरताही उत्पादनवाढीच्या आड येत आहे. गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, गारगोटी आदी तालुक्यांतील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यापर्यंत आहेत. बहुतांशी ऊस लागवड असलेल्या शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल आदी तालुक्यांत हे प्रमाण केवळ ०.६० ते ०.८० टक्के इतकेच आहे. सातत्याने रासायनिक खतांचा अतिवापर आणि दुसऱ्या बाजूला सेंद्रिय खत वापराचे घटलेले प्रमाण यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चिंताजनक झाले आहे.