नागपूर ः येथील कळमना बाजार समितीत गत आठवड्यापासून गव्हाचे दर स्थिर आहेत. सरबती गव्हाची सरासरी आवकदेखील १०० क्विंटलच्या आत असून दर २२०० ते २६०० रुपये क्विंटलवर स्थिरावले आहेत. हरभरा दरात मात्र मोठे चढउतार होत असल्याचे चित्र आहे. हरभऱ्याचे दर मंगळवारी (ता. १२) ६ हजार रुपये क्विंटलवर पोचला होता. आता मात्र हरभऱ्याचे दर ५५०० रुपये क्विंटलवर स्थिर असल्याची माहिती बाजारसमितीच्या सूत्रांनी दिली.
बाजारात लुचई तांदूळाची आवक १०० क्विंटलच्या आत असून दर १९०० ते २२०० रुपये क्विंटल आहेत. तांदूळाच्या दरात देखील कोणतेच बदल झाले नाही. तुरीच्या आवकेत मोठे चढ आणि उतार होत असल्याचे चित्र आहे. ३०० क्विंटल आवक असलेली तुरीची आवक आता ५१ क्विंटलपर्यंत खाली आली आहे. तुरीचे दर ४००० ते ४०३२ रुपये क्विंटलपर्यंत आहेत.
मुगाला ३५०० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळत आहे. उडिदाचे व्यवहार ३८०० ते ४००० रुपये क्विंटलने झाले. जवसाचे दर ४२०० ते ४४०० रुपये क्विंटल होते. त्यातदेखील वाढीची शक्यता नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. भूईमुगाला ४००० रुपये क्विंटल असा दर होता. परंतु, सध्या भुईमूगाचे दर २५०० ते ३००० रुपये क्विंटलपर्यंत आहेत. सोयाबीन २९०० रुपयांवर स्थिर असून त्यात काही अंशी चढउतार शक्य आहे. येथे
लसणाला २५०० ते ४००० रुपये क्विंटल असा दर आहे. टोमॅटोला १६०० ते २००० रुपये क्विंटल असा दर आहे. सध्या आवक वाढल्याने टोमॅटो दरात वाढीची शक्यता नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. चवळी शेंगांचे दर वधारले असून ते २००० रुपयांवरून २५०० रुपये क्विंटल असे झाले आहेत.