जळगाव : जिल्ह्यात १३ डिसेंबरपासून शासकीय कडधान्य खरेदी केंद्र शासनाने पूर्वसूचना देऊन बंद केले. परंतु जिल्ह्यात सद्यःस्थितीत सुमारे पाच हजार क्विंटल उडीद पडून आहे. त्याची खरेदी केली जावी, यासंबंधी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आहे.
मागील आठवड्यातच यासंबंधी शासनाकडे मागणी करण्यात आली. परंतु, त्याबाबत अजूनही सकारात्मक निर्णय झालेला नाही. जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व पाचोरा येथे शासकीय कडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. १३ डिसेंबरअखेर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी मागील आठवड्यातही सुरू होती. एकट्या जळगाव येथील केंद्रात ३५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी केंद्र बंद झाल्यानंतरही झाली. नोंदणी केलेल्या काही शेतकऱ्यांनी उडीद आणलेला नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनमधील सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात उडीद शिल्लक असल्याची बाब आसोदे (ता. जळगाव) येथील नवनिर्मिती शेतकरी विज्ञान मंडळाने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. केंद्र काही दिवस सुरू करावे, असे साकडे या मंडळाने प्रशासनाला घातले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केंद्र सुरू करण्यासंबंधी हालचाली केल्याची माहिती मिळाली.