जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात नवती केळीचे दर ९७५ रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात नंतर मात्र सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी (ता. १९) नवती केळीचे दर ९७५ रुपये क्विंटल होते. बुधवारी (ता. २०) त्यात थोडी सुधारणा झाली आणि दर एक हजारांवर पोचले. नवरात्रोत्सवाचा काळ असल्याने केळीला मागणी बरी आहे. शुक्रवारपासून (ता. २२) केळीचे दर स्थिर असून, त्यास १०२५ रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.
नवती केळी बागांची कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु सणासुदीमुळे मागणी वाढत आहे, अशा स्थितीत केळीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, दरात आणखी सुधारणा होण्याचे संकेत रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळाले आहेत.
जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात उडीद व मुगाची आवक मागील आठवडाभरात कमी-अधिक अशीच राहिली. या दोन्ही प्रकारच्या कडधान्याला कमाल ४५०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला. बाजार समितीत याच महिन्यात थेट लिलाव पद्धतीने धान्य खरेदी विक्री सुरू झाली आहे. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद लाभला आहे.
सुरवातीला मूग व उडदाची आवक बरी होती; पण हळूहळू ती कमी होत गेली. मागील आठवड्यात उडदाची आवक प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल राहिली तर मुगाची आवक ४५० क्विंटल एवढी होती. मुगाच्या आवकेत घट झाली आहे. उडदाची आवकही स्थिर नाही. मुगाला ४००० ते ४५०० रुपये तर उडदाला कमाल ४५०० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.
बाजार समितीत कांद्याची सरासरी १५० क्विंटल आवक झाली, कांद्याला ५५० ते १२०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला. कांद्याची आवक स्थिर होती. टोमॅटोची प्रतिदिन सरासरी ४० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ९०० ते १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची आवक मात्र कमीच म्हणजेच प्रतिदिन सरासरी दीड क्विंटल राहिली. भेंडीला ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची आवक कमी असल्याने तिचे दर तेजीत होते. एकच दर भेंडीला मिळाला. सध्या केवळ धरणगाव व जळगाव तालुक्यांतून भेंडीची आवक होत आहे.
कोथिंबिरीची आवक पाच क्विंटल एवढी स्थिर राहिली. तिला क्विंटलमागे २००० ते ३५०० रुपये दर मिळाला. लवंगी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. तिला मागील पंधरवड्यात चार हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाले होते. गत सप्ताहात मात्र आवक प्रतिदिन ६५ क्विंटलपर्यंत पोचली. या वेळी हिरव्या मिरचीला ८०० ते १५०० रुपये क्विंटलचे दर मिळाले.