वऱ्हाडात हंगामाच्या सुरवातीपासूनच वन्यप्राण्यांचा त्रास

परिसरातील बऱ्याच भागात माॅन्सूनपूर्व कपाशीची लागवड झाली आहे. परंतु हरणे रोपांची पूर्ण पाने खातात आणि ते लहान झाडाची पाने खाल्ली तर पूर्ण झाड मरून जाते. त्यामुळे तेथे पुन्हा बियाणे लावावे लागत आहे आणि केळीच्या लहान रोपांची रानडुकरे नासाडी करीत आहेत. याबाबत संबंधित विभागाने पंचनामे करून दखल घ्यावी आणि नुकसानभरपाई द्यावी. - विशाल भालतिलक, बोर्डी, ता.अकोट, जि. अकोला.
पीक नुकसान
पीक नुकसान

अकोला : जंगलाचे क्षेत्र सातत्याने घटत चालल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्यांचा अाश्रय घेत अाहेत. हे प्राणी पाणी व चाऱ्याच्या शोधात सातत्याने फिरतात. या प्राण्यांचे कळप शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी बनत असून, या वर्षी तर पीक उगवणीपासून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत अाहे.

वऱ्हाडात मेळघाट, काटेपूर्णा, ज्ञानगंगा अशी प्रमुख अभयारण्ये अाहेत. याशिवाय अाणखी छोटी अभयारण्येसुद्धा अाहेत. यामध्ये वन्यप्राण्यांची संख्या मोठी अाहे. या जंगलांमधील हिंस्र श्वापदांनी शेतकऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. याहीपेक्षा प्रामुख्याने रानडुक्कर, रोही, हरणांचे कळप दिवसेंदिवस वाढत चालल्याने मोठी डोकेदुखी बनली अाहे.

हे कळप एखाद्या शेतातून गेल्यास काही पीक खातात, तर काही पीक हे जनवारांच्या खुरांमुळे तूटून पडते. असे प्रकार या वर्षी मोठ्या प्रमाणात समोर येत अाहेत. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक अंकुरल्यापासूनच कसरत करावी लागत अाहे.

सध्या वऱ्हाडात ५० टक्केसुद्धा सरासरी पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र जे पीक अंकुरत अाहे त्याचे वन्यप्राण्यांमुळे अधिक नुकसान होत अाहे. सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे प्रामुख्याने प्राणी नुकसान करतात. रानडुकरे ज्वारी, मका या पिकांची अधिक नासाडी करतात. रात्रीच्या वेळी ३० ते ४० हरिण, रोही, रानडुकरांचा कळप शेतात घुसून नुकतेच अंकुरलेल्या पिकाचे अतोनात नुकसान करीत अाहे.

रानडुकरांचे हल्ले पाहता शेतकरी जीव मुठीत घेऊनच पिकांचे रक्षण करावे लागत अाहे. मात्र एवढे करूनही नुकसान अधिक होत अाहे. अाधीच अार्थिक संकटात सापडलेले शेतकरी यामुळेही चिंतातुर झाले अाहेत. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत अाहेत.

शेतीत मशागत, पेरणी, बियाणे, व्यवस्थापन, काढणी, वाहतूक अशा विविध खर्चांसह अाता पिकांच्या संरक्षणाचा देखील खर्च वाढला अाहे. असंख्य शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी कुंपण करणे, जाळ्या लावणे किंवा राखणदार ठेवणे अनिवार्य झाले अाहे. या उपाययोजना करणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतांमध्ये रात्रीच्या वेळी पहारा द्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती अाहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com