यवतमाळ : विदर्भ - मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात केवळ १४ टक्के साठा शिल्लक आहे. परिणामी रब्बी हंगामातील सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील सिंचन अधांतरी राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
विदर्भ मराठवाड्यासाठी महत्त्वाचा सिंचन स्त्रोत असलेला पैनगंगा नदीवरील इसापूर धरणात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सिरसम, खंडाळा, अनसिंग, गोरेगाव, गोवर्धन, शिरपूर, डोणगाव, सारखेडा, वाशीम, रिसोड, मेहकर या परिसरात कमी पर्जन्यमान झाले. पाच महिन्याच्या कालावधीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त ७४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील एक लाख २५ हजार ४९० हेक्टरवरील रब्बी हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.
धरणाच्या पाण्यातूनच विदर्भातील ८४ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याद्वारे यवतमाळ जिल्हयातील १९ हजार ३२० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. ११७ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे मराठवाड्याच्या नांदेड जिल्हयातील ९२ हजार २१० हेक्टर जमिन व हिंगोली जिल्हयातील १३ हजार ९६० हेक्टरवरील शेती सिंचनाखाली येते.
मागील वर्षी या महिन्यात धरणात ४२ टक्के पाणीसाठा होता. त्यावर संपूर्ण लाभक्षेत्रात सिंचन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यंदा स्थिती चिंताजनक आहे. रबी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकांनी बोअरवेल खोदत पर्यायी सिंचनाचे मार्ग शोधले. अल्पभूधारक शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे.