संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या काढणीत पावसामुळे अडथळे

कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात असतानाच मंगळवारी (ता.१७) दुपारनंतर विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे पीक काढणीत मोठे अडथळे आले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. मळणीसाठी तयारी केलेले पीक झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. गगनबावडा, पन्हाळा, आजरा, हातकणंगलेसह शिरोळ तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भाताची काढणी करणे अशक्‍य झाले. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी अर्धवट ठेवावी लागली.

गगनबावडा तालुक्‍यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे तासापेक्षाही अधिक काळ झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापणी केलेले भात पीक भिजले. पावसामुळे कापून टाकलेले भात रचून ठेवण्यासही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. राशिवडे, शिरगाव परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल उडाली. भात कापणीवर परिणाम झाला. परिसरात भात कापणी, मळणी, वाळवणे, पिंजर वाळवणे अशी कामे सुरू आहेत. दुपारी पावसाने जोरदार सुरवात केली. यामुळे भात कापणी मळणीची कामे अर्धवट स्थितीत बंद केली.

शाहूवाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात दुपारपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन पावसाला अचानक सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसाने काढणीयोग्य भात पिके, तसेच मळणी सुरू असलेल्या भात पिकाला फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताचे पिंजरही भिजल्याने ते कुजण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com