जळगाव : मागील हंगामात शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीचा मोठा फटका बसलेला असतानाच हेक्टरी सहा हजार ८०० सरसकट मदतनिधी वाटपाचा धडाका लावला. मात्र, अनेक कापूस उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तितका मदतनिधीही दिला जात नसल्याची बाब समोर आली आहे.
यावल तालुक्यातील सावखेडासीम येथील शेतकरी अनिल विश्राम पाटील यांचे अर्धा हेक्टर क्षेत्र बोंड अळीमुळे नुकसानग्रस्त झाले होते. त्यानुसार त्यांना तीन हजार ४०० रुपये रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु त्यांना अर्धा हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र गृहीत धरून प्रशासनाने फक्त तीन हजार रुपये मदतनिधी दिला आहे.
जळगाव तालुक्यातील एका पूर्वहंगामी कापूस उत्पादकाला १३ हजार ५०० रुपये मदतनिधी मिळणे अपेक्षित होते. कारण त्यांच्या सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद आहे. एक हेक्टर बागायती कापूस, अशी नोंद त्यांनी केली होती. परंतु या शेतकऱ्यालाही कोरडवाहू क्षेत्रासंबंधीचा हेक्टरी सहा हजार ८०० रुपये मदतनिधी जाहीर केला आहे. जो मदतनिधी जाहीर केला आहे, तेवढाही प्रशासन देत नसून, परस्पर आकडे ठरविले जात आहेत.
टेबलावर बसून पंचनामे दाखविले. बागायती (पूर्वहंगामी) कापूस उत्पादक गृहीतच धरले नाहीत. सरसकट कोरडवाहू क्षेत्र गृहीत धरून हेक्टरी सहा हजार ८०० मदतनिधी देण्याचे प्रकार प्रशासन करीत असतानाच कोरडवाहू क्षेत्रासंबंधी जाहीर निधीही पुरेशा प्रमाणात प्रशासनातील कर्मचारी देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
नवा कापूस हंगाम सुरू झाला तरी अजून मागील हंगामाच्या नुकसानीसंबंधीची रक्कम जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या कापूस उत्पादकांना मिळालेली नाही. यावल, रावेर, अमळनेर, पाचोरा भागांतील काही शेतकऱ्यांना हा मदतनिधी मिळाला आहे. जळगाव, चोपडा, भुसावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना हा निधी मिळालेला नाही. शेतकरी विचारणा करायला गेले तर १५ ऑगस्टनंतर निधी मिळेल, असे उत्तर त्यांना दिले जाते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.